मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात सोमवारी पहिल्यांदाच मोठे फेरबदल करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या जागी अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली. मुंबई काँग्रेसची धुरा माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्याने पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी लक्षणीय खांदेपालट केले आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत तर अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले तर त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात ४२ जागा पडल्या होत्या. त्यामुळे ठाकरेंविरोधात पक्षातील काही नेत्यांनी मोर्चा उघडला होता; परंतु त्याकडे वारंवार हायकमांडने दुर्लक्ष करत नेतृत्व बदल करण्यास टाळले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नारायण राणे, डॉ. नितीन राऊत, बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी नावे चर्चेत होती. मात्र, ‘पेड न्यूज’ प्रकरणाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर तसेच बहुचर्चित ‘आदर्श’ घोटाळय़ामुळे मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने त्यांच्या माथी असलेले ग्रहण काही केल्या सुटे ना झाले होते. तेव्हापासून चव्हाण यांच्याकडे पक्षाने महत्त्वाची कुठलीही जबाबदारी सोपवली नव्हती. गांधी घराण्याशी निष्ठावंत असलेले चव्हाण यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून हायकमांडची द्विधा मन:स्थिती राहिली. निवडणुकीच्या काळात देखील त्यांना बाजूला ठेवण्यात आले होते; परंतु गेल्या काही दिवसांत न्यायालयाकडून चव्हाण यांना मिळालेला दिलासा तसेच लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी विजश्री खेचून आणत पक्षश्रेष्ठींचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यात यशस्वी झाले. अखेर त्यांचे उत्तम संघटनकौशल्य ध्यानात घेता काँग्रेसने त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली. चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भक्कम स्थान पाहता पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाने त्यांना संघटनेत परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असणारे संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा विचार करता उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असलेल्या संजय निरुपम यांच्याकडे पक्षाने मुंबई अध्यक्षपदाचा पदभार सोपवला आहे. महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवायचे असल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतांची निर्णायक भूमिका लक्षात घेता, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय समाजात लोकप्रिय असणार्या आणि आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध असणारे संजय निरुपम यांनी आपण येणार्या काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष मुंबईत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारेल, अशा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.