सातारा(जिमाका) :जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी तसेच चारा याबाबत उपाययोजना करणारा कृती आराखडा तयार ठेवावा. त्याचबरोबर उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करावी, अशा सूचना देताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकरी अश्विन मुद्गल यांनी दिला.
पालकमंत्री विजय शिवतारे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईबाबत होणाऱ्या बैठकीतील विषयांचा पूर्व आढावा जिल्हाधिकारी श्री.मुद्गल यांनी आज नियोजन भवनमध्ये घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, उप वनसंरक्षक अनिल अंजनकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश गणेशकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.
सुरुवातीला श्री.सोमण यांनी तालुकानिहाय उपाय योजनांबाबत आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री.मुद्गल पुढे म्हणाले, तालुकनिहाय तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता यांनी कोणतीही कर्तव्यात कसूर न करता गावांमध्ये पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने काटेकोरपणे उपाययोजना कराव्यात. यात प्रामुख्याने विंधन विहिरींची दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण, नवीन विहिरींची कामे याला प्राधान्य द्यावे. 22-45 मध्ये विशेष दुरुस्ती योजना राबवावी. टंचाई कृती आराखडा तयार ठेवावा.पाण्याचा स्त्रोत दृष्टीकोनातून उपाययोजनांना सुरुवात करावी. केवळ नळ पाणीपुरवठा योजनेच्या नादुरुस्तीमुळे टँकर सुरु करणे, हे खपवून घेतले जाणार नाही. या कामात कसूर केल्यास गुन्हे दाखल केले जातील.
माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांचा सविस्तर आढावा घेऊन श्री.मुद्गल पुढे म्हणाले, उरमोडीचे पाणी माण मध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे निश्चितपणे तेथील टंचाईग्रस्त गावांमध्ये फरक पडेल. धोम बलकवडीचे पाणीही फलटण खंडाळयाकडे गेले पाहिजे. हे कालवे फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. आवश्यक त्या ठिकाणी 144 कलम जाहीर करा. पोलीस बंदोबस्त ठेवा. असे आदेश त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. धोम वगळता बाकीच्या धरणांमधील पाणी पातळी चांगली आहे. खटाव मधील पुसेसावळी प्रादेशिक पाणी योजना युध्दपातळीवर सुरु करावी. गावनिहाय नियंत्रण ठेवा. टँकर फिडींग पॉईंट सुस्थितीत ठेवून प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांचे कृती आराखडे तयार करावेत.
चारा टंचाईबाबतही आढावा घेऊन श्री.मुद्गल म्हणाले, चारा टंचाई होणार नाही याची खबरदारी आजपासूनच घ्या. ज्या तालुक्यांमध्ये उपलब्ध चारा आहे, तो संभाव्य टंचाईग्रस्त भागंामध्ये पाठविण्याबाबतही नियोजन करा. यावेळी सर्वच तालुक्यांमध्ये पुरेसा चारा उपलब्ध असल्याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकिला जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
टंचाईबाबत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – अश्विन मुद्गल
Date: