‘यशस्वी’ संस्थेतर्फेआयोजित सर्जिकल स्ट्राईक स्मृतीदिनानिमित्त युवकांशी संवाद.
पुणे : लष्करी जीवनाप्रमाणेच सामान्य नागरी जीवनामध्येही शिस्त आणि वक्तशीरपणा यांची जोपासना करणे गरजेचे आहे, किंबहुना तसे झाल्यास हीच मोठी देशभक्ती ठरू शकते. असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अर्थात आयआयएमएस च्यावतीने आयोजित सर्जिकल स्ट्राईक स्मृतीदिनानिमित्त युवकांशी संवाद साधताना बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी आपल्या लष्करी कारकीर्दीतील तवांग व कारगिल येथील अनुभव सांगितले.
तसेच २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक विषयी बोलताना त्यांनी सांगितले कि
‘पाकिस्तानने भारताची प्रतिमा ही फक्त बचावाची भूमिका घेणारा देश अशी केली होती. मात्र, वेळप्रसंगी सडेतोड उत्तर देण्याची भारतीय सैन्याची तयारी असते, हा संदेश सर्जिकल स्ट्राइकमधून देण्यात आला. सर्जिकल स्ट्राइक ही अत्यंत योजनाबद्ध रीतीने राबविलेली धाडसी मोहीम होती. त्याद्वारे पाकिस्तानला व एकंदरीतच जगाला संदेश दिला गेला, की भारतसुद्धा अशा प्रकारचे पराक्रम करू शकतो.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही आजही आम्हा लष्करी जवानांसाठी मार्गदर्शक ठरते त्यामुळे मराठ्यांचा हा जाज्वल् य इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.
या संवाद सत्राचा समारोप करताना त्यांनी सांगितले की,भारतीय सैन्यातील जवानांकडे असलेली देशाप्रतीची निष्ठा, प्रसंगी प्राणार्पण करण्याची तयारी हे गुण एकीकडे असताना दुसरीकडे सामान्य नागरी जीवन जगत असताना प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये विशेषतः युवकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे गरजेचे आहे.
यावेळी कार्यक्रमाला आयआयएमएस चे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र सबनीस, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. भरत कासार, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.डॉ. संतोष शिंदे, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटचे प्रा. श्रेयस सोहनी, माजी महापौर मुरलीधर ढगे, प्रताप भोसले, लागीरं झालं जी या झी वाहिनीवरील मालिकेचे सहायक लेखक महेश नरवडे यांच्यासह प्रतिभा इन्स्टिट्यूट, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जेएस पीएम या संस्थाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी तर आभार प्रदर्शन पवन शर्मा यांनी केले.