मुंबई- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या “राजगृह” या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या समाजकंटकां च्या बुद्धीची कीव येते, बाबासाहेबांच्या वास्तू चे पावित्र्य हे अशा घटनेने कधीच कमी होणार नाही. सरकारने यापुढे कायमस्वरूपी सुरक्षा पुरविण्याचा घेतलेला निर्णय हा उशिरा आलेले शहाणपण असा प्रकार आहे. यापुढे महापुरुष व त्यांच्या शी निगडित गोष्टींचा सन्मान राखलाच गेला पाहिजे याकडे शासनाने जातीने लक्ष द्यायला हवे. असे येथे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या “राजगृह” या निवासस्थानी काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता या बाबतची पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष आणि विधी विभागाच्या शिष्टमंडळा बरोबर बाळा नांदगावकर यांनी राजगृहास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तिथे उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत अनेक दिवसांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
त्याचप्रमाणे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत मनसे जनहित कक्ष आणि विधी विभागाच्या वकील शिष्टमंडळाने त्वरित माटुंगा पोलिस ठाणे येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या सोबत चर्चा करून गुन्हेगाराना त्वरित पकडून अत्यंत कडक कारवाई करण्याची मागणी नांदगावकर यांनी यावेळी केली.या शिष्टमंडळात मनसे विधी विभाग सरचिटणीस ॲड. संतोष सावंत, ॲड. रविंद्र पाष्टे, ॲड. अनिल गजने, उपाध्यक्ष ॲड. दिपक शर्मा, ॲड. उजाला यादव, चेतन पेडणेकर यांचा समावेश होता.