बारामती- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात धाकधूक असल्यामुळेच त्यांनी फक्त स्वत:चाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी करून घेतल्याचं राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार बारामतीत म्हणाले. आहेत “कुठेतरी आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनात धाकधूक असल्यामुळे त्यांनी स्वत:चा शपथविधी केला. पण इतर मंत्रीमंडळ विस्तार केला नाही. ११ तारखेनंतर विस्तार करू असं म्हणाले आहेत. कुठेतरी पक्षांतरबंदीच्या संदर्भात ज्या गोष्टी मधल्या काळात घडल्या किंवा इतर राज्यात अशा घटना घडल्या, तेव्हा काय निकाल लागले याकडे पाहाता येईल”, असं अजित पवार म्हणाले.बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेनेतील बंडावर सुरुवातीच्या काळात अनेकजण म्हणाले की आमचा या घटनांशी दुरान्वयानेही संबंध नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण नंतर एका नेत्याच्या पत्नीनंच सांगितलं की माझा नवरा रात्री वेशभूषा बदलून अनेकदा इतरांना भेटायला जायचे. हे मी म्हणत नाही. एकीकडे तुम्ही सांगता की आमचा संबंध नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी घडत नव्हत्या. साम-दाम-दंड-नीतीचा अवलंब करून यातून मार्ग काढण्याचं ध्येय समोर ठेवून या गोष्टी केल्या गेल्या. त्यातून बंड झालं”, असं अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. “कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. ६७ सालापासून शरद पवार राजकारणात आहेत. आपण सगळ्यांनी चढउतार पाहिले आहेत. मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद पाहिलं आहे. मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद पाहिलं आहे. आजही विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडू. विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी नसते. पण कुणी चुकत असेल, तर ती चूक सांगितली गेली पाहिजे”, असं अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.अजित पवारांनी बंडखोर आमदारांना देखील यावेळी टोला लगावला. “शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे सरकार अल्पमतात आलं. दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणी होती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की ते आमदार आपल्यासोबत नाहीत. आमदारांचीही चांगली ट्रीप झाली. सूरत बघितलं, गुवाहाटी बघितलं, गोवा बघितलं. बरंच काय काय झालं. पण नंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ठरवलं होतं की उद्धव ठाकरेंच्या पाठिशी शेवटपर्यंत राहायचं. त्याप्रमाणे आपण त्यांच्या पाठिशी राहिलो”, असं अजित पवार म्हणाले.