नवीदिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या त्रिपुरात नऊ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. सुमारे 262 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी 2752 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, जनरल (निवृत्त) व्ही के सिंग, राज्याचे मंत्री,आमदार तसेच केंद्र आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यांतर्गत आणि बांग्लादेशाशी वेगवान आणि सुलभ कनेक्टीव्हिटी स्थापन होऊन राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातली विविध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे सुरक्षित आणि जलद वाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत. यातून या भागातल्या कुशल, अर्ध कुशल आणि अ कुशल मनुष्य बळाला रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन तसेच वाहनांच्या देखभालीचा खर्च कमी होणार आहे. स्थानिक भागांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याची मदत होणार आहे. यातूनच कृषी मालाची वाहतूक आणि मोठी बाजारपेठ यासाठी वाहतुकीत सुधारणा होऊन वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा तत्काळ आणि सहजपणे उपलब्ध व्हायलाही मदत होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागाच्या पर्यटन, आर्थिक विकासाला आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे. राज्याच्या जीडीपीलाही यामुळे चालना मिळणार आहे.