मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने माध्यम वर्तुळात अंदाजांचे पतंग उडवले जाऊ लागले. याला विराम देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री . नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले ,’नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाहीत. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही .
राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचे अंतर आहे. शिवाय विचारसरणी वेगळी आहे असेही नवाब मलिक म्हणाले. आजच्या घडीला किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार तयार करण्यात आलेले आहे. ते व्यवस्थित काम करत असताना काही लोक तारीख पे तारीख देत मी पुन्हा येईन सांगत आहेत. हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो मात्र यांचा अंदाज खरा ठरत नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.