मुंबई : एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आज सुनावणी झाली. शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. तसेच पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष केला. हा महाविकास आघाडीला झटका असल्याचे वृत्त दिले जाते आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली सुप्रीम कोर्टाने शिंदे गटातील आमदारांना निलंबित केले नाही, हा महाविकास आघाडीला झटका नाही. बंड पुकारलेले आमदार आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहे. त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा काढला तर सर्व निलंबित होतील. पाठिंबा काढल्याचे कोर्टात सांगायचे नसते. ते राज्यपालांना कळवायचे असते, असेही जयंत पाटील म्हणाले.कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळेच भाजपचे नेते विक्ट्री असे दाखवत आहे. ते याचीच वाट पाहत होते. कारण, प्रत्येक माणूस आशेवर असतो, असेही जयंत पाटील म्हणाले.बंडखोर आमदारांकडून निधी मिळाला नाही असे वारंवार कारण सांगण्यात येत आहे. या मुद्द्यालाच धरून शिवसेनेच्या आमदारांना बंड पुकारला आहे. मात्र, राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कोणत्या खात्याला किती निधी दिला हे सर्वांसमोर आले तर हा गैरसमज दूर होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.