मुंबई, दि. १४ नोव्हेंबर – महाविकास आघाडी सरकारची एसटी कर्मचाऱ्यांविषयी भावना सहनुभूतीची आणि संवेदनशीलतेची दिसत नाही. ३९ जणांचे मृत्यू झाले. काल एक आत्महत्या झाली, हृदयविकाराचा झटक्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अजून सरकारला किती बळी हवेत? आता जर सरकारने न्याय दिला नाही आणि महाराष्ट्रातील शंभर टक्के एसटी कर्मचारी एकवटले आणि उद्या जर त्यांच्या भावनांचा विस्फोट झाला व परिस्थिती प्रक्षोभक झाली तर त्याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
प्रसारमाध्यमाशी बोलताना दरेकर म्हणाले की,एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवन – मरणाचा प्रश्न निर्माण होऊन राहिला आहे आणि सरकार सहानुभूतीने विचारही करणार नसाल तर टोकाचा विचार एसटी कर्मचारी करतील असे वातावरण आहे. आमची पहिल्यापासून अशी भूमिका राहिली आहे की चर्चा करायची ती कर्मचाऱ्यांबरोबर करा. कारण हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांचे उत्स्फूर्त आहे. इथे ना कुठली युनियन ना कुठला नेता, ना कुठला पक्ष आहे. आम्ही फक्त त्यांच्या समर्थनार्थ आहोत आणि उद्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुम्हीही चर्चेला या, निश्चितपणे आम्ही चर्चेलासुद्धा यायला तयार आहोत. परंतु आम्ही थेट चर्चा करणे त्या कर्मचाऱ्यांशी प्रतारणा होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच वेळेला सर्व तालुक्यांत, सर्व जिल्ह्यांत, सर्व डेपोत असे राज्यव्यापी आंदोलन झाले असेल, तर ते केवळ एसटी कर्मचाऱ्याचे झाले. या आंदोलनाबद्दल प्रवासीदेखील या कर्मचारी व एसटीच्याबाबतीत कुठे आरडाओरड करताना दिसत नाहीत. याचे कारण हा एसटी कर्मचारी वर्षभर सेवा देण्याचे काम करत असतो याच्या संवेदना प्रवाशांना आहेत.