मुंबई, दि.१४ : राज्यात आज १९ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराखालील (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. आज दिवसभरात १० हजार ५५२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट नोंदवली गेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७८ लाख ३८ हजार ३१८ नमुन्यांपैकी १५ लाख ५४ हजार ३८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.८३ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ८० हजार ९५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार १७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.