मुंबई-भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज मुंबई पार पडली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. या नव्या कार्यकारिणीच्या काळात मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याद्वारे बिहारनंतर फडणवीस यांनी आता ‘मिशन मुंबई’ सुरु केले आहे.मुंबई भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करताना फडणवीस म्हणाले, “मला विश्वास आहे की या कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल.”मुंबई पालिकेतील कारभारावर निशाणा साधतानाच फडणवीस यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांवरूनही ठाकरे सरकारला लक्ष्य केले. सध्याच्या राज्य सरकारने प्रकल्पांना केवळ विरोध करण्यापलीकडे काहीच केले नाही. शेवटी प्रत्येक प्रकल्पात रोजगार मराठी माणसालाच मिळणार आहे. तरीही यांचे काम विकासविरोधी आहे आणि दुसरीकडे जनतेला विकास हवा आहे, असे नमूद करत मेट्रो कारशेडच्या बदललेल्या जागेवरून फडणवीस यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. केवळअहंकारासाठी मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून चार वर्षे मुंबईकरांना मेट्रो मिळणार नसून जनतेच्या पैशाचा चुराडा करण्याचा हा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवालच फडणवीस यांनी सरकारला केला. पूर्वी एक वाक्प्रचार होता, इच्छा तेथे मार्ग आता नवीन वाकप्रचार आला आहे आणि तो ‘टाइमपास तेथे कांजूरमार्ग’ असा आहे, असे म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला. आमच्या सरकारच्या कार्यकाळात मुंबईचे सारे प्रकल्प मार्गी लागले. ट्रान्सहार्बर, कोस्टल रोड, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, रो-रो सेवा, बीडीडी चाळ व धारावी पुनर्विकास असे कितीतरी प्रकल्प त्यात सांगता येतील. सामान्य मराठी माणसाच्या हिताचे प्रकल्प आता मात्र थंड बस्त्यात गेले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
“राजाचा जीव पोपटात तसा काहींचा जीव मुंबई महापालिकेत”
“ज्या प्रकारे राजाचा जीव पोपटामध्ये तसा काही लोकांचा जीव मुबंई महापालिकेमध्ये आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. आपल्याला आता मुंबई महापालिकेचीच तयारी करायची आहे. भ्रष्टाचाराचं आगार असलेली ही महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, अशा सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकारिणीला केल्या. आम्ही दोस्ती पाळायच्या काळात महापालिका देऊन टाकली, पण आता नाही. भाजपा मुंबईमध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक बुथमध्ये राजकीय कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, अशा सूचनाही यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
राज्यात करोनाचे सर्वाधिक केसेस असतानाही मंत्री पाठ थोपटून घेतात
फडणवीस म्हणाले, “मला कधीकधी आश्चर्य वाटतं सरकारचे मंत्री नेते सर्वाधिक केसेस असतानाही स्वतःची पाठ कसे काय थोपटून घेतात. महाराष्ट्रात जी भीषण अवस्था आम्ही बघितली ती देशात कुठेही बघितली नाही. करोनाच्या काळात काही लोकांनी आपलं चांगलं करुन घेतलं. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम यांनी केलं. आधी आम्ही सरकारला या संकट काळात साथ देत होतो. आता मात्र यांची लक्तरं वेशीवर टांगायला सुरुवात करणार आहोत.”
करोनाच्या काळातील भ्रष्टाचारावर आम्ही पुस्तिका तयार करीत आहोत लवकरच ही पुस्तिका प्रकाशित करु आणि यांचा खरा चेहरा समोर आणू. यांना करोनाची चिंता नव्हती तर करोनाच्या नावाखाली पैसा कसा खाता येईल याची चिंता होती. लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीजबिलं आली त्यावेळी सरकारनं केंद्राची मदत घेऊन सांगितलं की, बिलामध्ये सवलत देऊ पण ऊर्जा मंत्र्यांनी काल सांगितलं की कोणालाही सवलत मिळणार नाही, अशा प्रकारे सरकारने गरिबांशी विश्वासघात केला, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
✅ देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण,
देशातील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात,
मग कोरोना नियंत्रणात आणण्याचे श्रेय कसे घेता?
आतापर्यंत टीका करायची नाही, हे ठरवून ठेवले होते. पण आता यांची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही.
✅ लोकांना 200 ते 300 पटींनी अधिक विजेची बिलं आली.
सवलतीचा मोठा गवगवा केला गेला.
मंत्रिमंडळात निर्णय घेतले.
वारेमाप घोषणा झाल्या.
आता म्हणतात बिल भरा!
गरिबांसोबत मोठा विश्वासघात झाला आहे.
✅ हे सरकार केवळ बदल्या आणि भ्रष्टाचार करण्यात मग्न होते.
रोज मोदीजी यांना नावं ठेवायची आणि बोलघेवडेपणा. हे लोकांना आवडत नाही, अशांना लोकांची साथ कधी मिळत नाही.
✅ आपल्या सरकारच्या काळात मुंबईचे सारे प्रकल्प मार्गी लागले.
ट्रान्सहार्बर, कोस्टल रोड, बांद्रा-वर्सोवा सी-लिंक, रो-रो सेवा, बीडीडी चाळ, धारावी पुनर्विकास असे कितीतरी प्रकल्प.
सामान्य मराठी माणसाच्या हिताचे प्रकल्प आता थंड बस्त्यात.
नवी मुंबई विमानतळ, मेट्रोचे कितीतरी प्रकल्प, झोपडपट्टीवासियांना घरे असे कितीतरी प्रकल्प सांगता येतील.
✅ पूर्वी एक वाकप्रचार होता
इच्छा तेथे मार्ग
आता नवीन वाकप्रचार
टाईमपास तेथे कांजूरमार्ग
✅ केवळ अहंकारासाठी निर्णय.
त्यातून चार वर्ष मुंबईकरांना मेट्रो मिळणार नाही.
जनतेच्या पैशाचा चुराडा करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला.
✅ प्रकल्पांना केवळ विरोध करण्यापलीकडे यांनी काहीच केले नाही.
शेवटी प्रत्येक प्रकल्पात रोजगार मराठी माणसालाच मिळणार आहे. यांचे काम विकासविरोधी. जनतेला विकास हवा आहे.
✅ पोलिसांच्या बळावर हे आम्हाला दाबू शकणार नाही.
जे काम स्व. इंदिरा गांधी यांना जमले नाही, ते तुम्हाला जमणार का?
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका.
काल ओरडणारे विचारवंत आज गप्प का आहेत?
सरकार बदलले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते का?
✅ मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता बदलण्याची वेळ आली आहे.
डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ आहे.
जनतेचा विचार करणारे लोक सत्तेत आणावी लागतील आणि हाच मुंबईचा संकल्प असला पाहिजे.
✅ हिंदुत्व बोलून सांगण्याचा विषय नाही.
तो कृतीतून दाखविण्याचा विषय आहे.