मुंबई दि.११ जून : वन जमिनींवरील रशिवाश्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाचा प्रश्न असून तो सोडवल्याशिवाय आणि त्यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय अशा दुर्घटना थांबवता येणार नाहीत. नाहक गरीब माणसांना जीव गमवावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
मुंबईत पहिल्याच पावसानंतर बुधवारी रात्री मालाडमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली. त्यापाठोपाठ दहिसरच्या चव्हाण चाळ, शंकर मंदिराजवळ केतकीपाडा येथे 3 घरं कोसळली. यात प्रद्युम्न सरोज नावाच्या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज विधान परिषदेचे विरोधी।पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन आपद्ग्रस्तांच्या अडचणी समजून घेतला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार गोपाळ शेट्टी हे देखील होते. या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हजारोच्या संख्येने एसआरए स्कीम अर्थवट स्थितीत आहेत. बिल्डरांकडून पुनर्वसनासाठी बाहेर काढलेल्या लोकांना भाडे देखील मिळत नाही. पुनर्वसन योजना तातडीने पूर्ण करणे, तोपर्यंत भाडे देणे, या गोष्टींचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु, दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. यापूर्वी आम्ही दोन चार एसआरए स्कीमची कामे थांबवली. कारण, ते लोकांना भाडे देत नव्हते. ठराविक काळात प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना झाला होता, पण त्याची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.
वनजमिनीवरील रहिवाश्यांचे पुनर्वसन जवळच्या एसआरए योजनांमध्ये करण्याबाबतही पूर्वीच्या काळात निर्णय झाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, आणखी पाठपुरावा करून या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास भाग पाडू, असेही दरेकर म्हणाले.