पुणे-सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवत असतानाच लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलता जपणे महत्त्वाचे असून जागरूक राहून विविध उपक्रम करणे आणि लोकोपयोगी प्रकल्प उभारणे गरजेचे आहे असे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रयत्नातून कोथरूड येथील कै बिंदुमाधव ठाकरे रुग्णालयात पुणे मनपा आणि कॉक्लिया यांच्या संयुक्त विद्यमाने – स्वरनाद – हे जन्मजात कर्णबधिर मुलांसाठीचे बहुआयामी व सर्वांगीण अपंग पुनर्वसन केंद्राच्या औपचारिक उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि संदीप खर्डेकर हे दांपत्य संवेदनशील असून नागरिकांच्या समस्या सोडवत असतानाच ज्यांच्याकडे काहीतरी कमी आहे त्यांना मदत करण्याचे आदर्शवत कार्य करत असून या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्यावरील उपचारांसाठी,ऑपरेशनसाठी सर्वतोपरी मदत करु असेही त्यांनी सांगितले.आपल्याकडे जेव्हा सर्वकाही असते तेव्हा त्याचे मोल कळत नाही पण एखादा जरी अवयव नसला तरी किती अडचणींचा सामना करावा लागतो असे सांगतानाच माझ्या डाव्या डोळ्यात कॅंसर ची लक्षणे होती ,ती योग्य वेळी लक्षात आल्यावर त्या डोळयाचे ऑपरेशन करुन मेंदूवर होणाऱ्या परिणामावर मात करण्यात डॉक्टरांना यश आले आणि मी पुढे सामान्य जीवन जगत ३ वेळा आमदार मंत्री आणि भाजपचा प्रदेशाध्यक्ष ही झालो. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आणि समाजोपयोगी कार्य होत असल्याचे ही त्यांनी नमूद केले.
नियतीने ज्यांच्यावर अन्याय केला त्यांना पुन्हा सामान्य जीवन जगता यावे यासाठी हे केंद्र व डॉक्टर अविनाश वाचासुंदर आणि त्यांची टीम मोलाचे कार्य करत असून त्यांना कार्यासाठी योग्य मदत करु असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.ज्यांच्यावर निसर्गाने अन्याय केला आहे त्यांना माणुसकीच्या नात्याने सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदान करणे हेच आपले संस्कार असल्याचे ही श्री मोहोळ म्हणाले.या रुग्णालयात हे पुनर्वसन केंद्र आणि उपचार केंद्रासोबत नागरिकांच्या मागणीनुसार मॅटर्निटी होम /प्रसूतीगृह उभारण्याबाबत ही सकारात्मक विचार करुन निर्णय घेउ असे ही महापौर म्हणाले.
मी जेव्हा कॉक्लियाच्या संगम पुलाजवळील जागेत वार्षिक संमेलनासाठी पाहुणी म्हणून गेले तेव्हा तेथील अपुरी जागा आणि मुलांची मोठी संख्या बघून अधिक चांगले केंद्र उभारले जावे यासाठी मी प्रयत्नशील होते असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.कोथरूड मधील कै.बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर मनपा आरोग्य विभागातर्फे ओ पी डी चालविण्यात येते मात्र इतर ५ मजले गत ६/७ वर्षे विनावापर पडून असल्याने या जागेचा सदुपयोग व्हावा यासाठी मी महिला व बालकल्याण समितीची सदस्य असताना प्रसूतीगृह सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनास दिला. मात्र नवीन डॉक्टर व इतर स्टॉफ भरतीला मान्यता मिळत नसल्याने येथे प्रसूतीगृह सुरु करणे अवघड असल्याचे प्रशासनाने लक्षात आणून दिले – त्यानंतर येथे जन्मजात कर्णबधिरांच्या पुनर्वसन केंद्राचा प्रस्ताव मांडून सर्व प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन हे केंद्र आकार घेत असल्याबद्दल मंजुश्री खर्डेकर यांनी समाधान व्यक्त केले तसेच या कार्यात माझा खारीचा वाटा असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे ही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ अविनाश वाचासुंदर म्हणाले ” दर हजार मुलांमागे ४ मुले जन्मजात कर्णबधिर असतात ,त्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सामान्य जीवन जगता यावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत.बजाज ऑटो ने येथे ५० लक्ष रुपये सी एस आर निधीतून खर्च करुन ऑडिओमेट्री रुम तयार केली असून आत्ता सुमारे २४० मुलांवर उपचार सुरु आहेत.त्यातील काहींवर ऑपरेशनही केले जातील ( एका ऑपरेशन चा खर्च हा ८ लाख रुपये असल्याचेही त्यांनी नमूद केले ) या कार्यास हातभार लावणाऱ्यांचे आभार मानतानाच त्यांनी पुणे मनपा,चंद्रकांतदादा पाटील,महापौर मुरलीधर मोहोळ आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी सभागृह नेते धीरज घाटे,नगरसेवक जयंत भावे,दीपक पोटे,माधुरी सहस्त्रबुद्धे,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,रुपाली मगर,जगदीश डिंगरे,जागृती कणेकर,माणिकताई दीक्षित,सुवर्णा काकडे,दीपक पवार व इतर नागरिक,पालक व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तर रक्षाताई देशपांडे यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.