पुणे : झारखंड येथील गिरडोह जिल्ह्यातील श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थानास दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करून ते ठिकाण तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी सकल जैन संघ पुणे च्या वतीने सोमवारी (९ जानेवारी) सकाळी ९ वाजता भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पुणे शहरातील शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील जैन समाज हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे.
पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सकल जैन संघ, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, उपाध्यक्ष विजय भंडारी, उपाध्यक्ष मिलिंद फडे, सचिव अनिल गेलडा, प्रसिद्धी प्रमुख सतिश शहा व योगेश पांडे यांनी ही माहिती दिली.
भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्ष आणि हिंदू, मुस्लिम, बौद्ध धर्मियांनी देखील श्री सम्मेद शिखरजी संबंधीच्या जैन धर्मियांच्या मागणीला पूर्ण समर्थन दिले आहे. त्यामुळे सोमवारी निघणाऱ्या भव्य मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने जैन समुदाय सहभागी होईल. तसेच, या मूक मोर्चामध्ये जास्तीत जास्त जैन समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्रासह देशातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, इंदोर, सुरत, बंगळुरु, कोल्हापूर याठिकाणी हजारोंच्या संख्येने जैन समाजाचा मोर्चा निघाला आहे. या विषयाकडे केंद्र व झारखंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इतर शहरांमध्येही असेच मोर्चे निघणार आहेत.
श्री सम्मेद शिखरजी या पवित्र स्थळाविषयी जैन समाजाच्या भावना तीव्र आहेत. सरकारने याची त्वरित दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. जैन धर्मियांच्या भावना तीव्र असण्याचे कारण म्हणजे जैन धर्माच्या २४ पैकी २० तीर्थंकरांची निर्वाणभूमी श्री सम्मेद शिखरजी येथे आहे. हिंदु धर्मियांसाठी जसे काशी तीर्थस्थान आहे तसेच, जैन धर्मियांसाठी श्री सम्मेद शिखरजी आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदातरी या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा ठेवते आणि दर्शनासाठी जाते. याठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, अशी जैन धर्मियांची भावना आहे.
श्री सम्मेद शिखरजी येथील तीर्थस्थानाचा परिसर आदिवासीबहुल आहे. जंगल, डोंगर यांनी तो व्यापला आहे. हे स्थळ समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंच आहे. येथे २० तीर्थंकरांच्या चरण पादुका आहेत. दर्शनासाठी येथे २७ किलोमीटरची परिक्रमा पायी करावी लागते.
“श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान असल्याने त्याला पर्यटनस्थळ म्हणून मिळालेली मान्यता योग्य नाही. त्याला जैन समाजाचा विरोध आहे. हे पवित्रस्थळ असून त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. देशामध्ये कोणत्याच धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थानाच्या ठिकाणी असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे जैन धर्मियांच्या या पवित्र तीर्थस्थानासंबंधीही चुकीचा निर्णय होऊ नये. श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ म्हणून न राहता ते तीर्थक्षेत्रच राहिले पाहिजे, त्याचा तीर्थक्षेत्राचा दर्जा कायम राहावा, अशी सकल जैन समाजाची मागणी आहे.”
– अचल जैन (अध्यक्ष, सकल जैन संघ, पुणे)
“आज खऱ्या अर्थाने जैन वर्ग दु:खी झाला आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरून मगच निर्णय घ्यायला पाहिजे का? हा एक प्रश्न मोठा आहे. आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा विरोध केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत यासंदर्भात परिपत्रक काढले गेले नाही. जैन समाज हा नेहमी शांतीप्रिय असा समाज आहे. मक्का, मदिना, काशीसारखा आमचे तीर्थक्षेत्र आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे. लोकांच्या भावना दुखवल्या जातील, असं कार्य आम्हाला सरकारकडून अपेक्षित नाही. हा फक्त विषय धर्माचा नाही. हा विषय आहे संस्काराचा, इतिहासाचा. या गोष्टी आस्थेवर अवलंबून आहेत. आमची सरकारला विनंती आहे की, आता आश्वासन नको तर परिपत्रक काढून निर्णय घ्यावा.”
– विजय भंडारी (उपाध्यक्ष, सकल जैन संघ, पुणे)
“जैन धर्मियांचे पवित्रस्थान म्हणून हे स्थान हजारो वर्षांपासून याठिकाणी आहे. मुघल व त्यानंतरची ब्रिटिश राजवट ते आतापर्यंत हे तीर्थस्थान टिकून राहिले आहे. झारखंड राज्याच्या निर्मितीपूर्वी हे स्थळ बिहारमध्ये होते. सध्या ते झारखंड राज्यात असून २०१८ मध्ये झारखंड सरकारने हे स्थळ पर्यटनस्थळ घोषित केले व तशी अधिसूचना काढली. त्यानंतर याला भारत सरकारच्या वन मंत्रालयाने इको सेंसिटिव्ह झोन सोबतच पर्यटनस्थळ म्हणून ५ ऑगस्ट २०१९ मध्ये मान्यता दिली.”
मिलिंद फडे (उपाध्यक्ष, सकल जैन संघ, पुणे)
“श्री सम्मेद शिखरजी हे पवित्रस्थान असून, पर्यटनस्थळ म्हणून याला आमचा विरोध आहे. झारखंड सरकारने काढलेले परिपत्रक आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आमच्या समाजात याबद्दल प्रचंड रोष आहे. आमची सरकारला ही विनंती आहे की, सरकारने पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द करून पवित्रस्थळ राहण्याबाबतचे परिपत्रक काढावे. आमचा हा विषय आस्था आणि भावनेशी निगडित आहे. त्यामुळे हे स्थळ पुन्हा पवित्रस्थळ राहावे, ही जैन समाजाची एकमुखी मागणी आहे.”
– अनिल गेलडा (सचिव, सकल जैन संघ, पुणे)
“सरकार कोणाचेही असो जैन समाजाने सरकारला नेहमीच साथ दिली आहे. तीर्थस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन तेथील अस्मिता, पवित्रता बिघण्याचे काम होणार आहे. अनेक ठिकाणी आमचे साधू-महाराज आजही उपोषण करत आहेत. त्यामुळे हे पुन्हा पवित्रस्थळ राहावे, या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढणार असून, सरकारने लक्ष द्यावे आणि निर्णय रद्द करून परिपत्रक काढावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.”
– सतिश शहा (प्रसिद्धी प्रमुख, सकल जैन संघ, पुणे)