मुंबई-दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांच्या निर्दोष सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय धक्कादायक, आश्चर्यकारक होता, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदारांमध्ये मंत्रिपदावरून अस्वस्था असल्याचे वाटते, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यालाही आमचे सरकार स्थिर असून अजित पवारच अस्वस्थ असल्याची टीका फडणवीसांनी केली.
साईबाबांसंबंधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाने अतिशय आनंदी आहोत. मुळात काल नागपूर खंडपीठान दिलेला निर्णयच हा आश्चर्यजनक व धक्कादायक होता. साईबाबा यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता, याबाबतचे अनेक पुरावे आम्ही उच्च न्यायालयात दिले आहे. मात्र, केवळ तांत्रिक मुद्द्यावर साईबाबांना सोडणे चुकीचे होते.
फडणवीस म्हणाले, नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात आम्ही तातडीने सुप्रीम कोर्टात गेलो. कोर्टानेही तातडीने बेंच गठीत करत निर्णय दिला. आमचे जे पोलिस नक्षलवाद्यांशी लढले, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिलासादायक आहे. तर, नागपूर खंडपीठाने काल साईबाबांच्या सुटकेचा दिलेला निर्णय पोलिसांसाठी क्लेशकारक होता.
अजित पवारच अस्वस्थ–मविआमध्ये मंत्र्यांकडूनच काळाबाजार
तसेच, राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही होत नाहीये. त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत म्हटले होते की, शिंदेंनी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवले होते. त्यामुळे काही जणांमध्ये अस्वस्था असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांतच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार स्थिर आहे. सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल व पुन्हा निवडून येईल. उलट अजित पवारांमध्येच अस्वस्थता आहे. त्यामुळेच ते असे वक्तव्य करत आहेत.मविआ सरकारमध्ये मंत्रीच रेतीचा काळाबाजार करत होते, असा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीस म्हणाले, मविआ सरकारमध्ये ज्या मंत्र्यांनी तसेच इतरांनी रेतीचा काळाबाजार केला, अशा सर्वांना जेलमध्ये टाकणार आहोत. असा भ्रष्टाचार आमच्या सरकारमध्ये चालणार नाही. आम्हाला भ्रष्टाचाऱ्यांकडून एक पैसाही नको. नियमाप्रमाणे सर्व पैसा सामान्यांसाठी सरकारच्या तिजोरीतच गेला पाहिजे. मविआ काळात ज्यांनी हा भ्रष्टाचार केला, त्यांना मी सोडणार नाही.