मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले आहे. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान ”पोलिसांनी माझ्याशी गैरवर्तन केले, एसीपी पांडूरंग शिंदे यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, चष्मा तोडला. त्यांच्यामुळे हाताला इजा झाली असे सदावर्तेंनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायधीश कैलास सावंत हे सदावर्ते यांना जखमा झाल्या आहेत का? याची पाहणी केली ”आपला हात दुखावला आहे, चष्मा तुटलेला आहे. मला उच्च रक्तदाब आहे अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना औषधे देण्याची परवानगी दिली.
दरम्यान सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाच्या आजूबाजूला असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालय परिसरातून जाणार नाही अशी भूमिका घेतली
अनिल परब म्हणाले , सदावर्ते यांनी कट रचला …
अनिल परब म्हणाले की, कामगारांना मार्गदर्शन करीत असून एसटी सुरु करण्याबाबत पाऊले उचलण्याबाबत मी चर्चा करून आलो. कायदा हातात घेतल्यानंतर काय होते हे आंदोलकांना दिसलेच आहे. कायदा हातात घेतल्यानंतर कुणाचीही सुटका नाही. सदावर्तेंना अपयश आले आहे. त्यांनी कुठलाही मुद्दा मान्य केला नाही. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी हल्ल्याचा सदावर्ते यांनी कट रचला असा आरोपही अनिल परब यांनी केला.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, जयश्री पाटील यांचे आरोप अंदाजपंचे
”न्यायालयाचा निर्णय आला आता आपण शांत राहावे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. सहकार्य करावे व मार्ग काढावा.” असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले. ”तपासाचा भाग पुढे नेऊन पुढील कारवाई केली जाईल.” असेही ते म्हणाले.जयश्री पाटील यांनी अंदाजपंचे आरोप केले आहेत. त्यांना शरद पवार आणि माझ्यावर आरोप करण्याची सवय आहे असेही गृहमंत्री म्हणाले.
तत्पुर्वी न्यायालयात सरकारची बाजू वकिल प्रदीप घरत यांनी न्यायालयात बाजू मांडली. गुणरत्न सदावर्ते यांच्या भाषणांचा उल्लेख त्यांनी न्यायालयात केला. भाषणात सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि चिथावणीखोर भाषणाचाही युक्तिवादात विधिज्ञ घरत यांनी उल्लेख केला. सदावर्ते यांनी आंदोलकांची माथी भडकावण्याचे काम आहे असेही त्यांनी न्यायालयात सांगत या हल्ल्यात पोलिस जखमी झाले त्यामुळे गुणरत्न सदावर्तें यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. दरम्यान सदावर्ते यांचे वकील विधिज्ञ वासवानी यांनी या कोठडीला विरोध केला आहे. सदावर्ते घटनास्थळी नव्हते, सीसीटीव्हीतही ते दिसत नाहीत त्यांचा या प्रकरणाशी संबंधच नाही. पण गृहमंत्र्यांविरूद्ध तक्रार केल्याने या प्रकरणात सदावर्ते यांना गोवण्यात आले. पोलिस जखमी झाले तर त्यांचा अहवाल न्यायालयात सादर का झाला नाही असा सवालही वासवानी यांनी करीत न्यायालयापुढे आपली बाजू मांडली .
109 एसटी कर्मचाऱ्यांची विधिज्ञ संदीप गायकवाड यांनी न्यायालयात बाजू मांडली. हे कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही ते गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करीत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर महिला आंदोलकांना न्यायालयाने विचारणा केली की, पोलिसांबद्दल आपली काही तक्रार आहे का यावर पोलिसांबद्दल कोणतीही तक्रार नाही असे महिलांनी सांगितले न्यायालयाच्या आवारात एसटी कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही निकालाची वाट पाहत होते
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावदेवी पोलिस ठाण्याने कलम 120 ब आणि 353 अंतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय, शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी 107 एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व 107 आरोपींना अटक केली आहे.
माझी हत्या होऊ शकते –
गुणरत्न सदावर्ते यांनी माझी हत्या होऊ शकते, असा दावा केला आहे. तसेच हे लोक लोकशाहीचा गळा घोटत असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनीदेखील माझे पती आणि आमच्या संपूर्ण कुटुंबालाच धोका असून आम्हाला काही झाल्यास त्याला शरद पवार यांना जबाबदार धरले जाईल, असे म्हटलं.
7 एप्रिलला सदावर्तेंकडून भाषण –
गेल्या 7 एप्रिलला गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. निवासस्थानी घुसून जाब विचारणार, असे वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते.
यलोगेट पोलिस स्टेशनमधून 107 आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कोर्टाकडे नेण्यात आले. यात महिलांचादेखील समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना पोलिस पाच व्हॅनमधून घेऊन गेले. त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येत आहे.
सदावर्ते यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल –
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कलम 107, 120 ब (कट रचणे), 132, 142, 143, 145, 147, 148, 332, 333, 353, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे कलम 353, 448, 453, यासह चिथावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमविणे, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य आणि हल्ल्याचा कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना सदावर्ते यांची काही चिथावणीखोर भाषणंही मिळाली आहे. यात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना चिथावल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुंबईत आज नाकाबंदी –
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत आज ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांची नाका-बंदी पाहायला मिळत आहे. ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करूनच पुढे सोडण्यात येत आहे.
आंदोलनाच्या ठळक घडामोडी
- एसटीतील 23 कामगार संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली. या कृती समितीने 27 ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत संप सुरू केला होता.
- एसटी संपादरम्यान मागण्या मान्य होत नसल्याने अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले.
- या संपावर भूमिका घेत, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून वाढवून 28 टक्के केला. तसेच 41 टक्के पगारवाढ देत इतर काही मागण्या सरकारने पूर्ण केल्या.
- राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर 20 डिसेंबर रोजी 54 दिवसांच्या आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारने संप मिटल्याचं जाहीर करत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं. पण, सरकारच्या घोषणेनंतरही एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले नाही.
- एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ही मागणी करत मुंबईच्या आझाद मैदानात संपात सहभागी असलेले कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आंदोलन कायम ठेवले. कर्मचारी संघटनांशी आमचं देणं-घेणं नाही. प्रत्येक कर्मचारी या आंदोलनात स्वेचछेने भाग घेतोय. कोणीही कामावर येणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली होती.
- यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले.
- उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संप मिटावा, यासाठी सरकारने विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमली.
- या समितीने विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला.
- अहवाल सादर करत सरकारने विधीमंडळाच्या अधिवेशनात आणि न्यायालयात आपली भूमिका मांडली.
- यानंतर आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनावर उच्च न्यायायाने 7 एप्रिलला निकाल दिला.
- मुंबई उच्च न्यायायाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला.
- रुजू होणार्या कामगारांवर संपात भाग घेतला या कारणास्तव कोणतीही कारवाई महामंडळाने करू नये, असेही आदेश न्यायालयाने सरकारला दिले.
- कारणे दाखवा नोटिसा देण्यात आलेल्या कामगारांना महामंडळाकडून दिलासा देण्यात यावा, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.
- कोरोना काळात काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना 23 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात प्रतिदिन 300 रुपयाचा भत्ता देण्यात यावा, असे न्यायालयाने सरकारला सांगितले.
- इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, पीएफचे पैसे देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
- न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.
- पण, त्यानंतर अचानक आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोडवरच्या “सिल्व्हर ओक’ निवासस्थानी धडक दिली.
- यानंतर रात्री 8 वाजता सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली.
- आज शनिवारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं.