मुंबई दि. 5 – झारखंड मधील गिरीडीह जिल्ह्यातील पारसनाथ पर्वतराज येथील तीर्थराज श्री सम्मेद शिखर जैन धर्माचे अनादिकाळापासून सर्वश्रेष्ठ पवित्र स्थान आहे. संपूर्ण विश्वातील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र क्षेत्राला पर्यटन क्षेत्र घोषित करू नये ही जैन धर्मीयांची मागणी योग्य असून आमचा या मागणीला पाठिंबा आहे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले. याबाबत मी संसदेत मुद्दा मांडणार असून झारखंड च्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. श्री सम्मेद शिखर चे पावित्र्य कायम राखण्यासाठी त्या क्षेत्राला पर्यटन क्षेत्र करू नये या साठी मी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन रामदास आठवले यांनी जैन धर्मियांच्या श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन युवा मंडळा चे अध्यक्ष विनय जैन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला आज दिले.
झारखंड मधील पारसनाथ पर्वतराज येथील श्री सम्मेद शिखर जी येथे 20 जैन तीर्थांकरांचे आणि अनेक संतांचे मोक्षस्थळ आहे. ते अत्यंत पवित्र स्थान आहे. तिथे झारखंड सरकारचा पर्यटन क्षेत्र करण्याचा मानस अत्यंत चुकीचा आहे. जैन धर्मियांच्या भावना त्यामुळे दुखावू शकतात. झारखंड सरकार ने श्री सम्मेद शिखरजी चे पावित्र्य धोक्यात आणू नये यासाठी मी झारखंड च्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी जैन धर्मियांच्या शिष्टमंडळाला दिले.