पुणे-राज्यामध्ये माझ्या शिवाय विधानसभा निवडणूका लढवण्यास सक्षम असे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ४९ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत. तसेच, भाजप आणि शिवसेना सोडून अन्य पक्षांबरोबर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुण्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
यावेळी शेट्टी यांना तुमच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीची तयारी कशाप्रकारे सुरू आहे ? तुम्ही स्वतः ही निवडणुक लढणार आहात का? की उमेदवार उभे करणार आहात? असा प्रश्न विचारण्यात आला असता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना सांगितले की, माझ्या शिवाय देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास सक्षम असे उमेदवार आमच्याकडे आहेत. आम्ही राज्यभरातील ४९ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. येत्या महिनाभरात आम्ही या तयारीचा अंदाज घेऊ. राज्यात आम्ही महाआघाडीचा भाग होतो त्यामुळे जागा वाटपासंदर्भात काही जर निर्णय घ्यायचा असेल तर महिनाभरात घ्यावा. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन आम्ही यादी जाहीर करू व निवडणूकीच्या कामाला सुरूवात करणार आहोत. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय त्या अगोदरच घेतला जावा, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय आपली स्वबळावर लढण्याची तयारी आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना शेट्टींनी सांगितले की, आम्ही एक महिनाचा कालावधी चर्चेसाठी राखलेला आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन आमचा निर्णय जाहीर करू. लोकसभा निवडणुकीतील निकाल लक्षात घेता. आम्ही विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलो असून राज्यातील प्रत्येक ठिकाणी संघटनेची ताकद कशा प्रकारे वाढली पाहिजे. या दृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना देखील करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.