नाशिक -छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे, राज ठाकरेंनी म्हटले होते. हे विधान अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खोडून काढले आहे. राज ठाकरे खोटा इतिहास मांडत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शंभू राजेंनी बांधली. महात्मा फुले यांनी महाराजांची समाधी शोधली. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे खोटे आहे. ज्यावेळी महात्मा फुले यांनी समाधी शोधली त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते, असेही भुजबळ यांनी म्ह्टले आहे. टिळकांनी समाधीसाठी फंड गोळा केला आणि तो ज्या बँकेत जमा केला ती बँक बुडाली असे सांगण्यात आल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. दरम्यान महात्मा फुले यांनी भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मात्र संभाजी भिडे यांनी आयुष्यभर मुस्लिमांचा द्वेष केला आणि काल परवा त्यांच्यावर मुस्लिम डॉक्टरने उपचारही केले, असा टोला त्यांनी यावेळी भिडेंनाही लगावला आहे.
राज ठाकरेंचे औरंगाबादमधील भाषणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. राज ठाकरेंवर मविआ आणि एमआयएमकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीय वादी संबोधले होते, यावरून छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव कधीच का घेत नाही असा सवाल उपस्थित केला आहे. तर राज ठाकरेंची कालची सभा केवळ जातीयवादी आहेत असे सांगण्यासाठी आहे असे वाटत असल्याचा म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगितला. प्रबोधनकारांचे विचार शरद पवारांनी त्यांना हवे तितकेच वाचले. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीय वादाला खतपाणी मिळाले असे राज ठाकरेंनी म्हटले होते. ज्या पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरा-घरात पोहचवला, त्या पुरंदरेंना शरद पवारांनी वृद्धापकाळात त्रास दिला का तर केवळ ते ब्राह्मण होते म्हणून, असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीय वादाला खतपाणी घालण्याचा आणि तो वाढविल्याचा आरोप केला आहे. रायगडावरील समाधी कुणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली, त्यांना काय तुम्ही ब्राह्मण म्हणून पाहणार का? टिळकांच्या पहिल्या वर्तमान पत्राचे नाव काय मराठा, हे पवार साहेब कधी सांगणार नाही, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता.