मुंबई.दि.२५: राज्यातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होत असलेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत याबाबत सविस्तर चर्चा झाली. लक्षवेधी क्रमांक ३ मध्ये पालघर येथील भीषण अपघात निमित्ताने सुनील शिंदे यांच्यासह नीलम गोर्हे सह अन्य सदस्यांनी राज्य अपघात मुक्त व्हावे व सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे १८ मे २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघाताचा उल्लेख करण्यात आला. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले होते. या ट्रकमधून सुमारे ६० जणांची अवैध वाहतूक होत असल्याचे समोर आले होते. तसेच १३ एप्रिल २०२६ रोजी कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलाजवळ सिमेंट मिक्सर आणि प्रवासी व्हॅनच्या भीषण अपघातात व्हॅनचालकासह ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही चर्चेत मांडण्यात आली. या दुर्घटनेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी व्हॅनचा पत्रा कापावा लागला होता.
या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण भागातील वाहतूक सुविधांबाबत विधानपरिषद सभागृहात महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. परिवहन विभागाने अवैध वाहतुकीवर नियंत्रणासाठी तयार केलेला आराखडा स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी ठरणार नसल्याचे नमूद केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सुलभ, जलद आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा उपलब्ध असल्या तरी त्या अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्य रस्त्यांपासून गावांपर्यंतच्या अंतर्गत प्रवासासाठी रिक्षा अथवा अन्य लहान प्रवासी वाहनांना नियमनबद्ध परवानगी दिल्यास नागरिकांना पर्याय उपलब्ध होईल आणि एका वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेण्याच्या प्रकारांना आळा बसू शकेल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
डॉ. गोऱ्हे यांनी अपघातांमध्ये इतर राज्यांतील वाहनांचा सहभाग असल्याच्या घटनांकडेही लक्ष वेधले. अशा प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे का, तसेच अपघातग्रस्त आणि मृतांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण व नुकसानभरपाई मिळाली आहे का, याचा शासनाने स्वतंत्र आढावा घ्यावा, अशी मागणी डॉ.गोऱ्हे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित अपघातांतील दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत दिली जात असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.तसेच शेतकरी परिवारात विवाहासाठी जाणाऱ्या वर्हांडासाठी स्वस्तात बससेवेचा विचार करण्याचे आश्वासन दिले

