पुणे-व्यक्तीचे व्यक्तीत्व हे त्याच्या वाणीच्या माध्यमातून कळते. वाणी अंतरंगाचे दर्पण असते. त्यामुळे बोलताना नेहमी विचारपूर्वक बोलावे. वाणीमध्ये वीणेची झनकार असली पाहिजे, मात्र आपल्या वाणीमध्ये बाण असतात. या शब्दांचे घाव इतके तीव्र असतात की ते कधीही भरू शकत नाहीत. त्यामुळेच मनात दुरावा, तिरस्कार निर्माण होतो. जी व्यक्ती ‘इट का जवाब पत्थर से’ अशी वृत्ती बाळगणारी व्यक्ती कधीही देवत्व मिळवू शकत नाही. याउलट ज्या व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा असेल, तीला सर्वत्र सन्मानपूर्वक वागणूक मिळते. त्यामुळे नर्म लहेजे से तो पत्थर भी पिघल जाते है’ ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले पाहिजे, अशा शब्दांत प. पु. 108 मुनिश्री पुलकसागर महाराज यांनी बोलण्यातील गोडवा ठेवण्याचा संदेश दिला.
तसेच इतरांच्या निर्णयावर अवलंबून न राहता, स्वत:ची रूची, क्षमता यांचा विचार करून स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे आणि सुनियोजित पद्धतीने काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे दहावे पुष्प गुंफतांना ’मिठी जुबान का जादू’ या विषयावर ते बोलत होते. समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. उदिता शहा, उपाध्यक्ष चकोर गांधी, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, उत्कर्ष गांधी हे उपस्थित होते. डॉ. उदिता शहा यांच्या हस्ते मुनिश्रींना शास्त्र भेट देण्यात आली. याप्रसंगी जीएसटीचे असिस्टंट कमिशनर एस.के. पाटील यांनी मुनिश्रींचे पादप्रक्षालन करून मंगल कलशाची स्थापना केली. यानंतर जिन सेवा ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
मुनिश्री म्हणाले, तुम्ही कितीही सौंदर्यवान असोत, कितीही श्रीमंत असोत या सर्वांपेक्षा जास्त महत्वपूर्ण असते, ते तुमचा व्यवहार. व्यवहार जर मधूर असेल तर सर्वांच्या मनात तुमच्याबाबत आदराचे स्थान निर्माण होते. वाणी ही मनाला तोडते आणि वाणीच मनाला जोडते. जगात प्रत्येक व्यक्तीला सर्वात जास्त कुठल्या गोष्टीचा हव्यास असेल तर ते प्रेमपूर्वक बोलण्याचा आहे. पारिवारिक संबंधामध्ये जर गोडवा असेल, तर कुटुंबात प्रेम, आदर आणि एकोपा वाढतो.”