पुणे- खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणात मिळून एकूण २०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ातील शेतीसाठी सोडण्यात येणारे आवर्तन ५ जूनपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. मात्र, १५ जुलैपर्यंत पाण्याबाबत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात चारही धरणात मिळून एकूण १८.३१ टक्के पाणीसाठा होता.शहर आणि जिल्ह्य़ात गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील धरणे ९० ते ९५ टक्के भरली होती. मात्र, मे महिन्याचा अंतिम टप्पा सुरू झाल्याने काही दिवसांपासून शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी येत्या ५ जूनपासून बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, टेमघर धरणास गळती लागल्याने धरणाच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण धरणातील पाणीसाठा रिकामा करावा लागला होता. त्यामुळे वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली. मात्र, जलसिंचन विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेती तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासलेली नाही. मुबलक पाणीसाठा असल्याने शहराला पाणी योग्य रितीने देण्यात येत आहे, अशी माहिती जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी दिली.टेमघर आणि वरसगाव धरणात पाणीसाठा शिल्लक नाही. मात्र, पानशेत धरणात ४८.४० आणि खडकवासला धरणात ३४.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठा २०.०५ टक्के असून गेल्यावर्षीपेक्षा तो २.५० टक्क्यांनी जास्त आहे.मान्सूनचा अंदाज घेऊन शासनाने दिलेल्या आदेशानुसार १५ जुलैपर्यंत पाणीसाठा योग्य रितीने ठेवणे गरजेचे आहे, असेही कपोले यांनी सांगितले.