भारतीय परंपरा, तत्वज्ञान आणि संस्कृतीला आधुनिक विज्ञानाची जोड हवी प्रा. श्रीनिवास वारखेडी यांचे मत
पुणे : “देशाची परंपरा, तत्वज्ञान आणि संस्कृती आधुनिक विज्ञानाशी जोडल्यावर देश शक्तीशाली बनेल. अत्याधुनिक विज्ञानाबरोबरच पारंपारिक ज्ञान दिल्यास विद्यार्थांबरोबरच देशाच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही.” असे मत बंगलुरू येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू व अधिष्ठाता प्रा. श्रीनिवास वारखेडी यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस, पुणे तर्फे ‘सिनरजायझिंग मॉर्डन एज्युकेशन विथ वेदिक सायन्सेस’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
यावेळी हैदराबाद येथील सायकोथेरपिस्ट, रिलेशनशीप कोच आणि इनर होरायझनच्या संस्थापिका डॉ.सुजाता पोटे, मुंबई येथील आयआयटीमधील ह्यूमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस विभागाचे सेल फॉर इंडियन सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी इन संस्कृतचे प्रा. के.रामसुब्रह्मण्यम , एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सचे अधिष्ठाता डॉ.साई सुसारला व प्रा. आसावरी भावे हे उपस्थित होते.
प्रा. श्रीनिवास वारखेडी म्हणाले,‘ ‘ तंत्रज्ञानामुळे आमची विचार करण्याची क्षमता वाढली आहे. परंतू आंतरिक ज्ञानामुळे आत्मोन्नती करून देशात परिवर्तन आणू शकतो. गेल्या शंभर वषार्ंमध्ये या गोष्टींवर फारसा विचार केला गेला नाही की, भारतीय संस्कृतीच्या आधारावर आम्ही शिक्षणाचे बीज पेरू शकू. वेदिक सायन्सेस या पाठ्यक्रमामधून आम्ही पुन्हा संकलित ज्ञान वितरित करण्यासाठी कार्य करीत आहोत.”
प्रा. डॉ. सुजाता पोटे म्हणाल्या,‘ ‘शिक्षण क्षेत्रात आता परिवर्तन आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. देशात जे मानसशास्त्र शिकविले जाते, ते फक्त विदेशी ज्ञानाच्या आधारावर आहे. ते आता अपुरे पडू लागले आहे. त्यामुळेच आता अशा विषयात भारतीय परंपरा, अध्यात्म आणि ध्यानासारख्या गोष्टी जोडणे आवश्यक बनले आहे. तसेच, इतर अनेक उपचार पद्धतींचे मूलतत्व भारतीयच आहे. ते विद्यार्थांना शिकविणे आवश्यक आहे. आतापर्यंत आम्ही अर्धवट ज्ञान शिकत आलो आहोत, त्यामुळेच त्याला भारतीय ज्ञानाची जोड देवून परिपूर्ण करून आधुनिक मानसशास्त्र निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल व प्रत्येक परिस्थितीचा सामना तो करू शकेल. ”
प्रा. के.रामसुब्रह्मण्यम म्हणाले,‘‘ भारतीय वैज्ञानिक ज्ञानाला समजणे आवश्यक आहे. गणिताची उत्पती आणि अध्यात्मशास्त्राच्या मुळ गाभ्याला जाणून घेतले पाहिजेे. त्यावर चिंतन व्हावे. देशाच्या इतिहासातील वस्तुस्थितीला जाणून घेणे आमचे आद्य कर्तव्य आहे. लोकांमध्ये परंपरेच्या विषयी जागरूकता आणावी लागेल. तसेच, तत्वज्ञान, मानसशास्त्र, गणित, भाषा या सारख्या जुन्या विषयांना आधुनिक शास्त्राची जोड देऊन नवीन पद्धतीने अध्यापन करावे लागेल. आपल्या जुन्या संस्कृतीच्या आधारावर चीन सारख्या देशाने जगात सर्वाधिक प्रगती केली आहे. हीच गोष्ट ध्यानात घेतल्यास आपलीसुद्धा बरीच प्रगती होईल.’’
डॉ.साई सुसारला म्हणाले, वेदिक विज्ञान ही आधुनिक शिक्षण पद्धती आहे. आपला देश हजारो वर्षे उन्नतीच्या शिखरावर होता. यामागचे रहस्य जाणून घेतले पाहिजे.
प्रा. आसावरी भावे यांनी प्रास्ताविक केले. अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले व
आभार मानले.