पुणे- आतापर्यंत केवळ गिरीश बापट , संजय काकडे ,अनिल शिरोळे ,मोहन जोशी ,अरविंद शिंदे ,अनंत गाडगीळ अशी नावे पुण्याच्या लोकसभा रणांगणात असल्याची चर्चा असली तरी,’मोका ‘ खाली तुरुंगात असलेले दीपक मानकर देखील या रणांगणात उतरत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मी तुरुंगात असेल वा बाहेर असेल पण अन्यायाच्या विरोधात, सामान्य तरुणांच्या हक्कासाठी लढण्यास सज्ज असेल अशी भूमिका घेत पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर आता लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात दिसल्यास आता नवल वाटणार नाही .
ज्याने स्वतः अन्यायाचा सामना केला आहे. ज्याने स्वतः गोरगरिबांचे दुखः जवळून पाहिले आहे अशीच व्यक्ती राजकारणात प्रस्थापित झालेल्या वाईटातल्या वाईट प्रवृत्तींशी सामना देऊ शकेल असे सांगत सध्या कारागृहात असलेले मानकर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरत असल्याचे चित्र आहे . बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी स्टाॅल द्या ,कोथरूड च्या कचरा डेपोच्या मोकळ्या जागेवरच मेट्रो स्थानका समवेत शिवसृष्टी देखील उभारा अन्यथा मेट्रोचा दगड देखील लावू देणार नाही ,बालगंधर्व रंग मंदिर तर पाडू देणारच नाही …अशा आक्रमक भूमिका घेणाऱ्या मानकर यांना .. एकाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक करून आयत्यावेळी चक्क मोका लावण्यात आल्याने त्यांचे कार्यकर्ते हैराण झाले तर पुणेकर अचंबित झाले . पण त्याहूनही पुढे गेली अडीच महिने हून आधी काळ त्यांना जामीन मंजूर न करता तुरुंगातच ठेवण्यात आले . हे करताना एकामागून एक असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्याचे सत्र सुरु झाले . त्यांना लोकसभा निवडणूक होईपर्यंत आता तुरुंगाबाहेर येवू देणार नाहीत अशी चर्चा देखील सुरु झाली . खमक्या विरोधकांना डांबून त्यांना जायबंदी करण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे . या पार्श्वभूमीवर मानकर यांनी अजिबात डगमगू न जाता लोकसभा लढवलीच पाहिजे अशी अपेक्षा हि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते आहे. पण पोलिसी आणि सरकारी भीतीने अद्याप त्यास म्हणावी तशी वाचा फुटताना दिसत नाही . मात्र येत्या 17 /18 जानेवारी नंतर मानकर बाहेर येतील आणि कायद्याच्या कचाट्यात अडकविलेल्या मानकर यांना कोणता राजकीय पक्ष लोकसभेची उमेदवारी देईल ? असा हि प्रश्न विचारला जातोय . यावरते अपक्ष उभे राहू शकतील, संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी राहू शकेल , कदाचित शिवसेना देखील त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणू शकेल असे सांगण्यात येते आहे . प्रत्यक्षात मानकर बाहेर येणार कि आतच राहून लढा देणार .. कि लढा न देताच आत राहणार किंवा बाहेर येवूनही शांत बसणार .. हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे .