नवीदिल्ली -तालिबानचे वाढते हल्ले पाहता केंद्र सरकारने अफगाणिस्तानातील सर्व भारतीयांना विमानसेवा बंद होण्यापूर्वी परतण्याचा सल्ला दिला. काबूलच्या भारतीय दूतावासाने भारतीय कंपन्यांना त्यांच्या बांधकाम स्थळांवरून भारतीयांना हटवण्यास सांगितले. भारताने अफगाणी वा परदेशी कंपन्यात काम करणाऱ्या भारतीयांना परत आणण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्राने म्हटले की अफगाणिस्तानात हिंसाचार वाढत असताना शहरांसाठी विमानसेवा बंद हाेत आहेत. यामुळे मजार-ए-शरीफहून नागरिक व दूतावास स्टाफला विशेष विमानाने मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनुसार, सध्या तेथे सुमारे १,५०० भारतीय अधिकारी व कर्मचारी आहेत. गत महिन्यात सरकारने कंधारच्या दूतावासातून ५० मुत्सद्दी व कर्मचाऱ्यांना परत बोलावले होते.
येथील हिंदू-शीख सुरक्षित स्थळी जात आहेत
उत्तर अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर तालिबानी ताब्यानंतर येथे राहणारी हिंदू व शीख कुटुंबे घरेदारे सोडून गेली आहेत. येथील प्रकल्पांत काम करणारे भारतीय मायदेशी परतले वा लपून राहत आहेत. काही भारतीय नागरिक सरकारी निवाऱ्यात आहेत. त्यांना भारत सरकार एअरलिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिण अफगाणिस्तानच्या पख्तिया प्रांताची राजधानी गार्डेजमध्ये डॉ. जगमोंग सिंह युनानी पद्धतीने स्थानिकांवर उपचार करतात. ते आताही तेथेच आहेत. ते दैनिक भास्करला म्हणाले, या संपूर्ण भागात हिंदू व शिखांची २०० कुटुंबे राहतात. मात्र हिंसाचाराच्या भीतीमुळे ती घरे सोडून सुरक्षित स्थळी गेली आहेत. बहुतांश लोक काबूल आणि गझनीला गेले आहेत. कारण तेथे आजही अफगाण लष्कराचे नियंत्रण आहे. आता फक्त माझेच कुटुंब इथे उरले आहे. काहीही हाेवो, आम्ही येथून जाणार नाही.’
अफगाणिस्तानच्या संसदेत शिखांचे प्रतिनिधित्व करणारे नरिंदरसिंह खालसा म्हणाले, ‘कुंदुज प्रांतावर तालिबानने कब्जा केल्यानंतर एका गुरुद्वाऱ्याला भेट दिली. तालिबानने त्यांना त्रास दिलेला नाही. आता बिगरमुस्लिमच नव्हे तर मुस्लिमही दहशतीत आहेत. पुढे काय होईल, हे कुणालाही माहीत नाही. तालिबानने काबूलवर हल्ला केल्यास या संघर्षात दोन्ही बाजूंनी मुस्लिमांचेच शिरकाण होईल.’ नरिंदर यांच्या वडिलांना २०१८ मध्ये इसिसने ठार केले होते. त्या अतिरेकी हल्ल्यात कुटुंबातील ८ सदस्यांसह १८ जणांचा मृत्यू झाला होता.