दिल्ली-मुंबई, 20 एप्रिल 2020
जी-20 राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सौदी अरेबिया येथे झाली. या बैठकीत डॉ हर्षवर्धन यांनी सर्व राष्ट्रांच्या एकत्रित आणि परस्पर सामंजस्य व सहकार्य यातूनच कोविड-19 चा लढा दिला जाऊ शकेल, या मुद्यावर प्रामुख्याने भर दिला.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवर पत्रकार परिषद
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.
- लॉकडाऊन काळातही खरीप हंगामासाठीच्या पेरणी- मशागतीची कामे गतीने सुरु आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत 36% अधिक कामे झाल्याची नोंद आहे, विशेषतः धानाच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.
- लॉकडाऊन मधून कृषीकामांना वगळण्यात आले आहे, मात्र शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे
- शेतकऱ्यांना कृषिउत्पादन कायम घेता यावे, यासाठी PM किसान योजनेअंतर्गत निधी देण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यांना डाळी देण्यात आल्या आहेत. पीएम फसल बिमा योजनेअंतर्गत विम्याच्या दाव्यांची रक्कम देण्यात आली आहे.
- कोविड-19 आपत्तीच्या काळात अन्नधान्य आणि नाशवंत मालाची वाहतूक सुलभतेने करता यावी यासाठी ऑल इंडिया अॅग्री ट्रान्सपोर्ट कॉल सेंटर आणि किसान रथ Mobile App सुरू करण्यात आले आहेत.
- फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्सना अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. मदतकार्यासाठी स्वयंसेवी संस्थाना एफसीआयकडून थेट अन्नधान्य खरेदीची परवानगी देण्यात आली आहे.
- भारतीय अन्न महामंडळाने लॉकडाऊनच्या काळात सरासरीच्या दुप्पट अन्नधान्याचे वाटप केले आहे.
- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मनरेगा रोजंदारीमध्ये वाढ केली आहे. सरासरी 20 रुपयांची वाढ आहे. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रधान मंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते
- ज्या भागात लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे, त्या ठिकाणी राज्यांच्या मदतीने योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. गृहमंत्रालयाने काल राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे राज्यांनी काटेकोरपणे पालन करायचे आहे.- गृह मंत्रालय
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे की या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेल्या उपाययोजनांपेक्षा जास्त कठोर निर्बंधांचा ते अवलंब करू शकतात, मात्र त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक तत्वांना शिथिल करू नये
- गृहमंत्रालयाने केरळ सरकारला पत्र पाठवले असून राज्याने परवानगी दिलेल्या काही बाबी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हंटले आहे. केरळने लॉकडाऊन नियमांचे कठोर पालन करावे असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे
- कोविड-19 स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि कोविड-19 च्या फैलावाला प्रभावी पद्धतीने प्रतिबंध करण्याच्या राज्यांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 6 आंतर- मंत्रालयीन पथके स्थापन केली आहेत.
- आतापर्यंत 2,546 जण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 14.75% इतके आहे. देशात सध्या कोविड चे एकूण रुग्ण 17,265 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 1553 नवे रुग्ण आले तर 36 जणांचा मृत्यू झाला- आरोग्य मंत्रालय
- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. लॉकडाऊन 2.0 च्या काळात शिस्तीचे पालन केल्यास कोविड-19 च्या संघर्षामध्ये विजयाच्या रुपाने त्याचे फायदे मिळतील, असे त्यांनी सांगितले
- जी-20 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की कोविडसाठीची लस आणि औषध विकसित करण्याच्या संशोधनात इतर सदस्य देशांसोबत काम करण्यास भारत उत्सुक आहे.
- सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
- लॉकडाऊनच्या आधी भारतात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 3.4 दिवस इतका होंता, आता त्यात सुधारणा होऊन तो 7.5 इतका झाला आहे. 19 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, 18 राज्यांत हा दर सरासरी राष्ट्रीय दरापेक्षा चांगला आहे.
- ओदिशा आणि केरळमध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 30 दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. गोव्यामध्ये कोविड-19 चे सर्व रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या गोव्यात एकही सक्रिय रुग्ण नाही
- गेल्या 28 दिवसांत कोविड19 चा एकही रुग्ण न आलेल्या माहे आणि कुर्ग या जिल्ह्यांच्या यादीत आता उत्तराखंड च्या पौरी गढवाल जिल्ह्याचाही समावेश झाला आहे. गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण न आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत आज आणखी सहा जिल्ह्यांची वाढ झाली आहे.
- आजपासून काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे तुम्ही पालन करावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. जेणेकरून कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत आणखी घट होईल आणि ग्रीन झोनमध्ये शून्य रुग्ण स्थिती कायम राहील
- रॅपिड अँटी बॉडी चाचणी ही वैयक्तिक निदानासाठी नाही, कारण, शरीरात असलेल्या अँटीबॉडीज विषाणूविरुद्ध किती प्रभावशाली ठरतील, याची आपल्याला कल्पना नाही. ही चाचणी केवळ निरीक्षणासाठी केली जाते. संसर्गजन्य आजाराबाबतच्या सर्वेक्षणात सातत्याने चुका झाल्या तरी,संसर्गाची व्याप्ती/दिशा तपासण्यावर त्याचा परिणाम होणार नाही.- ICMR
- RT-PCR टेस्टिंग किट्सचा वापर करताना ते नेहमी 20°C तापमानाखाली ठेवणे गरजेचे आहे, जर तापमान जास्त असेल तर चाचण्यांचे योग्य निष्कर्ष मिळणार नाहीत. तंत्रज्ञांनी नमुने सामान्य तापमानाच्या स्थितीत ठेवले असल्याच्या शक्यतेमुळे पश्चिम बंगालमधून तक्रारी आल्या असू शकतील
- मुंबईतल्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तावर आरोग्य मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली की ही अत्यंत दुर्दैवी बातमी असून सर्वांनी आपले काम करतांना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा , सॅनिटायझर वापरावा आणि सामाजिक अंतराचे नियम पाळावेत. नमुना चाचणीच्या निकषानुसार ज्या कोणाचीही चाचणी करण्याची गरज असेल, त्याची चाचणी केली जाईल.
इतर अपडेट्स :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइनवर काही विचार व्यक्त केले आहेत ज्यात तरुणांना आणि व्यावसायिकांना रस असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइनवर व्यक्त केलेल्या विचारांचा मुख्यांश इथे पाहता येईल
- गृह मंत्रालयाने आज 14 (पाच)या कलमानुसार एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित नियम वगळण्यात आले असून ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक नसलेल्या मालाचे वितरण करता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र कलम13(एक) अनुसार ई-कॉमर्स कंपन्यांना याआधी दिलेल्या परवानगीनुसार जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवण्यासाठी वितरण यापुढेही करता येणार आहे.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्ये, तेल विपणन कंपन्या अशा विविध संघटनांकडून प्राप्त झालेली देशभरातील उपलब्ध ढाबे आणि ट्रक दुरुस्ती दुकानांची यादी आणि तपशील आपल्या संकेतस्थळावर डॅशबोर्ड लिंक रुपात तयार केला आहे.
- कोविड -19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरातील जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतींच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
- कोविड-19 च्या महामारीमुळे संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाउन सुरू आहे. अशा संकटकाळात भारतीय रेल्वेच्यावतीने गरजूंना दररोज ताजे, गरम भोजन पुरवले जात आहे. रेल्वेने आत्तापर्यंत 20.5 लाख लोकांना मोफत भोजन वितरित केले.
- लाईफलाईन उडाणच्या विमानांनी सुमारे 507.85 टन आवश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक करण्यासाठी सुमारे 3 लाख किलोमीटर हवाई प्रवास केला आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खाजगी विमान वाहतूक कंपन्यांद्वारे लाइफलाईन उडाण अंतर्गत 301 उड्डाणे केली आहेत.
- कोविड-19 मुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वित्तमंत्रालयाच्या व्ययविभागाअंतर्गत असलेल्या महालेखा नियंत्रक कार्यालयाने सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन व्यवस्थेचा वापर करत, थेट लाभ हस्तांतरण योजनेमार्फत 16.01 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात 36,659 कोटी रुपये जमा केले आहेत.
- नॅशनल अॅल्युमिनीयम कंपनी (नाल्को) आणि महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (एमसीएल) या कोल इंडियाच्या उपकंपन्यांनी ओदिशामधील कोविड-19 रुग्णालयांना आवश्यक असलेला संपूर्ण निधी पुरविण्याचे ठरविले आहे.
- जैवतंत्रज्ञान विभाग(DBT) आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेने(BIRAC) कोविड-19 वर परस्पर सहकार्याने संशोधन करण्यासाठी अर्ज मागवले होते. या प्रक्रियेचा पहिला टप्पा 30 मार्च 2020 रोजी समाप्त झाला आणि यासाठी विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांकडून सुमारे 500 अर्ज प्राप्त झाले.
- केंद्र सरकारने https://covidwarriors.gov.in वर आयुष डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा व्यवसायिक, एनवायकेएस. एनसीसी, एनएसएस आणि पीएमजीकेव्हीवायचे स्वयंसेवक, माजी सैनिक इत्यादींसह डॉक्टरांच्या महत्वपूर्ण माहितीचा ऑनलाईन डेटा पूल उपलब्ध केला आहे जेणेकरून राज्य, जिल्हा किंवा नगरपालिका स्तरावर या माहितीचा स्थानिक पातळीवरील प्रशासनामध्ये उपयोग होईल.
- सध्याच्या काळातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, कृषी क्षेत्र हा आशेचा किरण असून अन्नसुरक्षेचे आश्वासन देखील ती प्रदान करीत आहे. असंख्य अडचणींचा सामना करीत संपूर्ण भारतभर कितीतरी शेतकरी आणि शेतमजूर शेतीकामात घाम गाळत आहेत, कष्ट करीत आहेत. त्यांच्या मूक प्रयत्नांना जोड मिळाली ती केंद्र आणि राज्य सरकारच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाची. त्यामुळेच रब्बी पिकांची कापणी आणि उन्हाळी पिकांची पेरणी कमीतकमी किंवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत देशातील कोविड-19 च्या आजाराला नियंत्रणात आणण्याबाबतच्या उपाययोजना आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. 20 एप्रिल 2020 पासून लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणण्याबाबत सर्व राज्यांशी चर्चा करावी असे निर्देश गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
- कोविड-19 मुळे सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वे अविरतपणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक मालाची वाहतूक प्राधान्यक्रमाने करत आहे. भारतीय रेल्वे औषधे, मास्क्स, रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टी तसेच इतर वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त बाबींचा पुरवठा वेळापत्रकानुसार धावणाऱ्या पार्सल विशेष रेल्वेगाड्यांमार्फत सातत्याने करत आहे. भारतीय रेल्वेने 18.04.2020 पर्यंत देशाच्या विविध भागात 1150 टन वैद्यकीय मालाची वाहतूक केली.
- कोविड-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान मदत निधीत देणगी म्हणून केंद्रीय विद्यालय संघटनेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 10,40,60,536 रुपये जमा केले आहेत. यात कोणी एक दिवसाच्या वेतनाइतकी रक्कम तर कोणी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली आहे.