नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020-सार्वजनिक स्थाने विशेषतः रस्ते, बाजारपेठा, खरेदीची दुकाने, सामाजिक केंद्रे, उद्याने, क्रीडांगणे, मैदाने तसेच रहिवाशी परिसरातल्या मोकळ्या जागा ही सर्व ठिकाणे सामाजिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत.
कोविड-19 हा कोरोना विषाणूजन्य आजार असून श्वसनरोग आहे. हा आजार माणसं शिंकली, खोकली तर त्यामुळे उडणा-या तुषारांमुळे पसरतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू बराच काळ टिकून राहतात. त्यामुळे अशा दूषित पृष्ठभागाशी थेट संपर्क आल्यास आजार संक्रमित होवू शकतो. मात्र या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी रासायनिक जंतुनाशकांचा वापर करणे सर्वात परिणामकारक आहे. या प्रभावी उपायामुळेच सर्वजण संक्रमणापासून दूर राहू शकणार आहेत.
कोविड-19 उद्रेक हा जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यावेळेपासून भारतीय शहरांमध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणी ज्या स्थानी विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे, अशा क्षेत्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. दि. 25 मार्च, 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बस, रेल्वे स्थानके, रस्ते, बाजारपेठा, रुग्णालयांचे परिसर, बँका, अशा सार्वजनिक स्थानांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये नवनवीन पद्धती स्वीकारण्यात आल्या आहेत.
शहरांमध्ये ताज्या भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्ध करून देण्यासाठी कृषी बाजारपेठांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मात्र बाजारपेठांचा परिसर सुरक्षित आणि स्वच्छ रहावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. भाजी मंडई आणि इतर सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची सुविधा देण्यात येत आहेत.
सोडियम हायपोक्लोराईट वापरून सार्वजनिक स्थानांचे निर्जंतुकीकरणासारठी शहरांमध्ये नवीन प्रयोग करण्यात येत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे तिरूप्पूर येथे एक कृत्रिम निर्माण करून तो निर्जंतुक करून भाजीपाला आणि शेतीमाल ठेवण्यासाठी वापरण्यात आला. याचेच अनेक शहरांमध्ये अनुकरण केले जात आहे. अत्यावश्यक सेवांसाठी असलेल्या अनेक संस्थांनी निर्जंतुकीकरणासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले आहेत.चेन्नई, बंगलुरू, रायपूर आणि गुवाहाटी यासारख्या स्मार्ट शहरांनी आपल्याकडील अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्जंतुकीकरणासाठी वापरले आहे. या शहरांमध्ये ज्या ठिकाणी माणसाला जावून निर्जंतुकीकरणाचे काम करणे अवघड आहे, अशा ठिकाणी ड्रोनच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले आहे.