झारखंड सरकारची भेट घेण्याचे आश्वासन
पुणे, दि. 13 : झारखंड राज्यातील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणार्थ येथील जैन समाजातील महिला भाजपच्या पुणे शहर कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. देशात पहिल्यांदाच जैन महिला रस्त्यावर आंदोलनासाठी उतरल्या होत्या, अशी माहिती मूकमोर्चाच्या संयोजिका शर्मिला ओसवाल यांनी दिली.
झारखंड सरकारने समेध शिखरजी येथे पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने त्याठिकाणी मांस, मटन दारु, रेस्टॉरंट सुरु होण्याच्या संभावना आहेत. तसेच जर त्याठिकाणी जे हेलिपॅड बनविण्यात आले आहे. ते जर व्यावसायिकतेसाठी असेल तर त्याला आमचा विरोध असेल आणि जर ते नॅशनल सिक्युरिटीसाठी असेल तर त्याला आमचा विरोध नाही. असेही महिलांच्या वतीने सांगण्यात आले. समेध शिखरजी येथे जैन धर्माच्या 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थंकरांचे निर्वाण झाले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या निर्णयामुळे या पवित्र स्थानाचे पावित्र्य धोक्यात आल्याने जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
झारखंड सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून शनिवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील संभाजी गार्डन ते भाजप कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्यात जैन समाजातील जेष्ठ महिलांसह तरुण महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व पदाधिकारी योगेश गोगावले यांना निवेदन देण्यात आले. आचार्य युगभूषण महाराज, व सर्व साध्वीजी, मुख्य आयोजक शर्मिला ओसवाल, रिटा गांधी, सुलभा भंडारी, कविता शहा, स्वाती मेहता, प्रिती गंगवाल यांच्या उपस्थितीत मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी जैन समाजातील महिलांच्या हस्ते निवेदन स्वीकारून त्यांना समेध शिखरवर पर्यटन स्थळ होऊ देणार नाही.असे आश्वासन यावेळी दिले. तसेच पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून व या मूकमोर्चाच्या माध्यमातून झारखंड राज्यातील भाजपचे सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत या भावना पोहचवल्या जातील असेही ओसवाल यांनी सांगितले.