ठराविक पतीराजांमुळे सर्वच नगरसेविकांची होतेय मानहानी -पुन्हा अशांना उमेदवारी देऊ नका : राजकीय पक्षांनी घालावे वेसण
पुणे- महापालिकेत कोणीही यावे आणि अधिकारी -कर्मचारी यांना वाट्टेल तसे फैलावर घेऊन पुढारपण करावे असे बरेचसे प्रकार सातत्याने होत असतात ,त्यातल्या त्यात काही विशिष्ट नगरसेविकांच्या पतीराजांनी तर संपूर्ण महापालिकेला हैराण करून सोडलेले आहे अनेक अधिकारी नौकरीच्या अगर संबंधितांच्या भीतीने , अगर काही अन्य कारणाने सारे काही सहन करत असतात ,पण आज असेच एका दमदाटी करणाऱ्या नगरसेविकेच्या पतीला एक अधिकारी चांगलाच भिडला . तसे हा अधिकारी भिडस्तच असल्याचे सारे जाणून आहेत .त्याचे झाले असे,’
एका वरिष्ठ नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या उपायुक्ताला एका भाजप नगरसेविकेच्या पतीराजाने रस्त्यातच शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही शिविगाळ जिव्हारी लागलेला अधिकारी थेट पोलिसांत तक्रार देणार असल्याचे समोर आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका राजकीय नेत्याचा वाढदिवस होता. त्याबाबत त्यास शुभेच्छा देण्यासाठी संबंधित अधिकारी या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात गेला होता. त्याचवेळी संबंधित नगरसेविकेचा पतीही तेथे आला होता. या पदाधिकाऱ्यास शुभेच्छा दिल्यानंतर नगरसेविकेचा पती तसेच अधिकारी कार्यालयाबाहेर आले.आणि यावेळी नगरसेविकेच्या पतीने ‘आमच्या भागात कारवाई करू नका, तुमचे कर्मचारी हप्ते घेतात. आम्हांला माहिती आहे. तुम्ही त्यात सहभागी आहात,’ असे अधिकाऱ्याला सुनावले. त्यानंतर संतापलेल्या अधिकाऱ्याने ‘आरोप करू नका मी अधिकारी आहे, आरोप करायचे असतील तर पुरावे द्या’ असे सुनावले. त्यानंतर या दोघांमध्ये भररस्त्यातच खडाजंगी झाली.अधिकाऱ्याने देखील या पतीराजाला चांगलेच बोल सुनावले .त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र, संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने महापालिका आयुक्तांना या प्रकारची माहिती देत थेट पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकाराची महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरू आहे.आता या पतीराजाने माफी मागितली तर ठीक नाहीतर कारवाई तर करणारच असा पवित्रा या अधिकाऱ्याने घेतल्याचे समजते .
दरम्यान पालिकेतल्या काही ठराविक नगरसेविकांच्या पतिराजांच्या दादागिरीच्या वागणुकीने सर्वच नगरसेविकांची मानहानी होत असल्याने चांगल्यांची देखील मान खाली जाते आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनीच अशा पतिराजांची दखल घेत अशांना उमेदवारी देताना टाळले पाहिजे असा सूर आता उमटतो आहे.