फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रकार निषेधार्ह –
पुणे – ठाकरे सरकारच्या भूमिकेचा फटका ओबीसींना बसला आहे, याप्रकरणी ओबीसी ना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याची टीका महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केली आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याला बसलेला फटका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकर्तेपणाचे फलित आहे. याविरोधात आवाज उठविणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतरांना ताब्यात घेत अटक करण्याचा प्रकार निषेधार्य आहे, अशी टीका महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे.
ते म्हणाले,’राज्यात असलेले महविकास आघाडीचे सरकार मराठा समाजाचे आरक्षण वाचवू शकले नाही आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण देखील टिकवू शकले नाही. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण रद्द करण्यामागे वाशिम आणि भंडाऱ्यातीस काँग्रेसचे क्रियाशील सदस्य आहेत. त्यांनी न्यायालयात धाव घेउन हे आरक्षण रद्द करवले. काँग्रेसचे नेते कोणत्या तोंडाने याविषयावर बोलतात? असा प्रश्न बिडकर यांनी विचारला आहे. यामुळे काँग्रेसची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मध्यप्रदेश, राजस्थान, गुजराथ तसेच छत्तीसगड मध्ये टिकू शकते मग महाराष्ट्रातच का नाही, हा ओबीसी समाजाचा सवाल आहे. ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे आणि आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारच्या असलेल्या उदासीन भूमिकेचा फटका ओबीसींना बसलेला आहे. असल्याने हा त्याचा परिणाम आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाने राज्यभर केलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत काही घोषणा करण्या ऐवजी, तसेच योग्य ती उपाययोजना करण्याची भूमिका घेण्याऐवजी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना अटक करण्याचे काम या ठाकरे सरकारने केले आहे. सत्ताधारी पक्षांचा लोकशाहीवर विश्वास नाही हे यामधून स्पष्ट होत आहे. आणीबाणीच्या घटनेला आज ४६ वर्षे पूर्ण होत असताना काँग्रेस तसेच ज्यांचा आणीबाणीला पाठींबा होता अशा शिवसेना यांच्या सरकारने अशी भूमिका घेतल्याने त्यांची लोकशाहीवर श्रद्धा नाही तसेच काहीही बांधिलकी नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी टिका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली.