नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. या पार्श्वभुमीवर केंद्रातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय परिवहन विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
देशातील आपत्कालीन प्रसंगात काम करणे सोपे व्हावे यासाठी देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणे तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत लोकांचा वेळ यामुळे वाचू शकेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये, रस्त्यांची दुरुस्ती आणि टोल प्लाझांवर आपत्कालीन सुविधा या दरम्यान सुरुच राहतील. कोरोनामुळे सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान हायवे तसेच राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या काळात केवळ आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहनं, अत्यावश्यक सेवांशी संबंधित सरकारी वाहनं आणि अॅम्ब्युलेंस आणि अशा सेवांशी संबंधित वाहनांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. गडकरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत वाहनांना सेवा पुरवण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल.