पुणे : राजधानी दिल्लीमध्ये संविधानाची प्रत जाळण्याचे पाप काही शक्तींनी केले होते. देशाचे पंतप्रधान मोदी त्यावेळी दिल्लीत असून देखील त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. केंद्रातील काही मंत्री सातत्याने संविधान बदलण्याची भाषा करतात तरी ते गप्प का बसतात, असा सवाल उपस्थित करत. याचा अर्थ सत्तेत असणाऱ्यांचा संविधान बदलण्याचा विचार त्यांच्या वागण्यातून आणि कृतीतून दिसत असतो. परंतु संविधान आमच्या जगण्याचा आणि वागण्याचा विचार आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही संविधान स्तंभ उभारले आहेत. आगामी २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या काळात त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. समाजात अस्वस्थता आहे, तेढ वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा वेळी हे संविधान स्तंभ, ‘आम्ही भारताचे नागरिक’ एक असून देशात सामाजिक सौहार्द आणि सलोखा राखण्यासाठी सदैव कटीबद्ध आहोत असा संदेश देत आहेत. येत्या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी सर्व शाळांमध्ये संविधान दिन साजरा केला जाणार आहे.
जेंव्हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि स्वतः मी पद आणि गोपनियतेची शपथ घेत असतो, तेंव्हा जाणिवपूर्वक संविधानाची शपथ घेतो. कारण संविधान हा आमच्यासाठी एक मोठा विचार आहे. देशाच्या ऐक्याची दिशा आहे. त्याविरोधात कोणी काही बोलत असेल तर त्याचा विरोध झालाच पाहिजे. संविधान बदलणाऱ्यांविरोधात आम्ही लढा देत राहू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या
महागाई आणि दुष्काळात दिवाळीच्या शुभेच्छा कशा देऊ….?
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. पुढचे काही महिने राज्यातील जनतेला अडचणीचे आहेत. या काळात आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सणावार, कार्यक्रम हे बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या सोबत उभे राहिले पाहिजे.सध्याच्या सत्ताधाऱ्यांना दुष्काळ दिसत नाही. त्यामुळे ही जबाबदारी आपल्यावर आलीय. तसेच महागाईमुळे दिवाळी देखील कशी करायची असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. सध्याच्या सरकारला दुष्काळ दिसत नाही. त्यामुळे एक दिवा घरी लावत असताना एक दिवा जे दिवाळी साजरा करु शकत नाहीत त्यांच्या घरी लावा, असे आवाहन देखील खासदार सुळे यांनी यावेळी केले.