मुंबई– महावितरणने बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी 21 हजार 570 मे.वॅ. विजेची मागणी यशस्वीपणे पुर्ण केली आहे. ही वीज मागणी आजपर्यंत नोंद झालेल्या कमाल वीज मागणीपेक्षा 825 मे.वॅ. ने जास्त आहे.
यापूर्वी दि. 23 ऑक्टोबर 2018 ला 20 हजार 745 मे.वॅ. एवढ्या कमाल वीजमागणीची नोंद करण्यात आली होती. सदर मागणी ही मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या कमाल मागणीच्या तुलनेत जवळपास 3 हजार 320 मे.वॅ. (18%,) इतकी जास्त आहे. वातावरणातील बदलामुळे व कृषि पंपाकरिता लागणाऱ्या विजेच्या मागणीतील वाढीमुळे एकूण विजेच्या मागणीत वाढ झालेली आहे.
महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या महानिर्मितीकडून 7 हजार 853 मे.वॅ., एनटीपीसी व एनपीसीआयएल कंपनीकडून एकूण 4 हजार 134 मे.वॅ., तसेच खाजगी प्रकल्प जसे अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लयु, एम्को इत्यादीकडून एकूण 4 हजार 567 मे.वॅ. वीज उपलब्ध झाली आहे. तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतामधून, सौर ऊर्जा- 1,864 मे.वॅ , पवन ऊर्जा – 156 मे.वॅ, व सहवीजनिमिर्ती प्रकल्पांमधून – 912 मे.वॅ असे एकूण 2 हजार 932 मे.वॅ. वीज उपलब्ध झाली आहे.
उर्वरित विजेची मागणी ही इंडियन एनर्जी एक्सचेंजमधून 575 मे.वॅ वीज खरेदी करुन व 950 मे.वॅ. कोयना जल विद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करुन पुर्ण के ली आहे. येथे असेही नमुद करने आवश्यक आहे की, मेरीट ऑडर डिस्पॅचनुसार जास्त वीज दर असलेले मे. रतन इंडिया- 1080 मे.वॅ., महानिर्मिती- 630 मे.वॅ. एनटिपीसी (सोलापूर)-640 मे.वॅ. असे एकूण 2350 मे.वॅ. क्षमतेचे संच हे बंद केलेले असतानाही ही मागणी पुर्ण केली आहे.
अशाप्रकारे महावितरणने वातावरणामधील बदल व कृषिपंपाचा वापर यामुळे अचानक वाढलेली विजेची मागणी ही उपलब्ध सर्व स्त्रोतांचा प्रभावीपणे वापर करुन वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे. तसेच मार्च व एप्रिल या महिन्यातील अपेक्षित विजेची मागणी लक्षात घेता महावितरणने सदर वीज मागणी पुर्ण करण्यासाठी तयारी केली आहे.