मुंबई-स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात यापुढे एक शब्दही सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.ठाणे येथे शिसवेना व भाजपतर्फे आयोजित सावरकर गौरव यात्रेत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्यांना सावरकर गौरव यात्रेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. सावरकर गौरव यात्रा ही तर केवळ एक छोटीशी झलक आहे. यापुढे आम्ही सावरकरांचा अवमान सहन करणार नाही. सावरकरांवर बोलताना नेत्यांनी विचारपूर्वक बोलले पाहीजे. सावरकरांच्या गौरव यात्रेतून त्यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
राहुल गांधींनी माफी मागावी- आशिष शेलार
दादरमध्येही शिवसेना व भाजपकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भाजप नेते आशिष शेलार या यात्रेत सहभागी झाली आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांविरोधात जे वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना माफी मागायला लावावी. तसेच, मविआच्या छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेवरही आशिष शेलार यांनी टीका केली. वज्रमुठ ही एकीची असते. मात्र, 10 ते 15 जण जेव्हा हात हातात घेऊन चालतात तेव्हा त्याला चाचपडणे म्हणतात. दरम्यान, दादरमधील भाजप व शिवसेनेच्या या यात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. विद्यार्थिनीही पारंपारिक वेशभूषेत या यात्रेत सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची आज वज्रमुठ सभा होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे शहरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर चौक समर्थनगर येथुन या यात्रेला सुरुवात होऊन, निराला बाजार मार्गे महात्मा फुले चौक, औरंगपुरा गुलमंडी मार्गे, उत्तम मिठाई भंडार भाटी बजार, पांदरीबा, अप्पाहलवाई मिठाई संस्थान गणपती मंदिर समारोप होईल. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ग्रेट पॉलिटिकल ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.
राज्यभरात 6 एप्रिलपर्यंत सावरकर गौरव यात्रा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात 30 मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी तसेच राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.
ठाणे शहरात ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फोटो उभारून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यासोबतच या यात्रेत ठाणे शहरातील शिवसेना व भाजपाचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महिला भगिनी एवढच नव्हे तर लहान मुले देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली होती. ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्यात आले ते या सगळ्यांना मान्य नव्हतं हे त्यांचे चेहरे सांगत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, बलिदान, समर्पण, देशप्रेम लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ही गौरव यात्रा काढली असल्याचे यासमयी बोलताना स्पष्ट केले.
ज्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांना अपमानित करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले, त्यांचेच पुत्र आणि नातू त्यांना वारंवार अपमानित करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ही शोकांतिका असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच ज्या राहुल गांधींनी सावरकरांना अपमानित केले त्यांचा धिक्कार करत असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.
याप्रसंगी खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटीका सौ.मीनाक्षी शिंदे, भाजपाचे महाराष्ट्र राज्य सचिव संदीप लेले, भाजपा महिला मोर्चा ठाणे शहर मृणाल पेंडसे, शिवसेना आणि भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.