पुणे- पेशवे काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणांची तळी बनवून,तिथले पाणी नासवून आता महापालिकेच्या प्रशासकीय कृपेने आणि राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेने पुण्याचे दक्षिण द्वार आता रोगराईचे द्वार बनले आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या हितसंबधीतांच्या अनधिकृत बांधकामांनी ड्रेनेज चे पाणी दोन्ही तळ्यात सोडून हे पाणी नासवले तर आहेच पण नेहमीच ठेकेदारांची पोटे फुगविणारी जलपर्णी देखील भेट दिली आहे .ज्यामुळे या तळ्याच्या आजूबाजूचा असा ४ किलोमीटर अंतराच्या परिसरावर डासांचे आणि घाणीचे साम्राज्य कायम वसले आहे. ज्यामुळे डेंग्यू,मलेरिया आणि वेगवेगळ्या रोगराईचा सामना या परिसरातील नागरिकांना करावा लागतो आहे.दरवेळी डास वाढवायचे म्हणजे नागरिकांच्या तक्रारी सुरु होतात आणि तक्रारी आल्या कि जलपर्णी काढण्याचे काम ठेकेदाराला मिळते अशी परंपरा महापालिकेने सुरु ठेवली आहे.आता हे डास जलपर्णीने वाढतात असे कारण दिले जाते.प्रत्यक्षात गेली २० वर्षे येथील जलपर्णी हटलेली नाही.हटवायची आणि पुन्हा वाढू द्यायची..म्हणजे पुन्हा दरवर्षी ठेकेदाराला काम मिळेल अशी सोय करून ठेवताना नागरी आरोग्याशी कसा खेळ खेळला जातोय याची उत्तम सोय इथे करून ठेवण्यात आली आहे.जागांचे भाव,घरांचे भाव ज्या कात्रज मध्ये गगनाला भिडून ठेवलेत तिथेच आरोग्याची समस्या देखील गगनी भिडलेली आहे हे वास्तव आहे. कात्रज च्या दोन्ही तळ्यात सोडले जाणारे गटारांचे पाणी हि इथली मूळ कारणे मीमांसा ठाऊक असूनही त्याकडे पद्धतशीर पणे आजवर दुर्लक्ष करण्यात आले आहे.हि गटारे,त्यातील पाणी इथे कसे येते हे पाहिले तर या परिसरात अनधिकृत बांधकामांचा उच्चांक दिसून येईल.हि बांधकामे सरळ इथे ड्रेनेज सोडून मोकळे होतात.तळ्यात खालून यामुळे जलपर्णीला खत मिळते आणि उन्हाळ्यात सूर्यप्रकाश यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात येथे जलपर्णी झालेली आहे. आणि हि जलपर्णी येथे डासांचे आणि पर्यायाने अनारोग्यकारक साम्राज्य निर्मितीचे स्थान बनली आहे. यावर कायम स्वरुपी उपाय योजना करणे गरजेचे आहे.या परिसरात त्यासाठी अनधिकृत बांधकामे होऊ न देणे आणि आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज लाईन व ड्रेनेज निचऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.म्हणजे तळी साफ स्वच्छ पाण्याची राहतील आणि जलपर्णी होणारच नाही यासाठी येथे काम करणे महत्वाचे होते व आहे. आणि असे करायचे झाले तर त्यासाठी ड्रेनेज ची व्यवस्था असलेली,महापालिकेची रीतसर परवानगी असलेली बांधकामेच असतील असा हा परिसर होईल.मात्र नैसर्गिक सुबत्ता लाभलेला पुण्याचे दक्षिण द्वार असलेला हा परिसर केवळ खाबुगिरी च्या कारणाने गलीच्छ् आणि रोगराईचे द्वार बनविला गेला आहे.