– महापालिकांच्या ११८ शाळांना ‘ग्रंथालये’ भेट
– महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन
कोथरुड (प्रतिनिधी)
‘पुस्तक वाचताना विद्यार्थ्यांनी पुस्तके ‘पाहायला’ वाचावीत आणि त्यातील शब्दरूपी नाद समजून घ्यावेत. पुस्तक वाचणे हे एखादा सिनेमा पाहण्यासारखे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक पाहायला आणि ऐकायला शिकवले पाहिजेत, असे बाल साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजीव तांबे यांनी व्यक्त केले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांचे संस्कृती प्रतिष्ठान, ‘ग्यान की’ आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या ११८ शाळांना प्रत्येकी १५० पुस्तकांचे संच भेट देण्यात आले. यात कथा, गोष्टी आणि महापुरुष चरित्रांचा समावेश आहे. त्यावेळी तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर मुरलीधर मोहोळ, गायक आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, कवी संदीप खरे, डॉ. संदीप अवचट, ‘ग्यान की’चे प्रदीप लोखंडे, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, मोनिका मोहोळ, माधुरी सहस्रबुद्धे, अल्पना वरपे, शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत, दीपक माळी, प्रवीण बढेकर, मिताली सावळेकर, शिव जावडेकर आणि दिनेश माथवड उपस्थित होते.
पुस्तके पाहायला आणि ऐकायला शिकावीत असे सांगून तांबे पुढे म्हणाले, ‘मराठी लिहा, मराठी वाचा आणि मराठी बोला हे सूत्र विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे. आपली मातृभाषा बोलताना आपल्याला न्यूनगंड कशाला यायला हवा? त्यामुळे आपण आपली सहीदेखील मराठीतच करायला हवी’.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतात. त्यांच्या घरी कोणतेही शैक्षणिक वातावरण आणि शिक्षणाला पूरक आर्थिक परिस्थिती घरात नसते, अशा परिस्थितीत पुस्तकांच्या माध्यमातून जिंकता येते. त्यासाठी हा उपक्रम अंत्यत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी ठरणार आहे’
प्रस्तावनेत ‘ग्यान की’चे प्रदीप लोखंडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आवडते ते करायला हवे. त्यासाठी आम्ही पुस्तकांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. वाचाल तर जिंकाल हाच मंत्र आयुष्यासाठी उपयुक्त आहे. वाचा, लिहा आणि बोला हे सूत्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे’.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जाधव यांनी केले.
विद्यार्थी-शिक्षकांना ‘हेलिकॉप्टर राईड’
वाटलेल्या पुस्तकांविषयी पत्राद्वारे प्रतिक्रिया कळावयाची असून त्यात ज्यांची प्रतिक्रिया उत्तम असेल अशा दोन विद्यार्थी, दोन विद्यार्थीनी आणि दोन शिक्षक यांना हेलिकॉप्टरद्वारे मुंबईचा प्रवास करण्याची संधी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून मिळणार आहे.