मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले असले तरिही त्यांना अजुनही जामीन मिळालेला नाही. दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी मलिक अटकेत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीस म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे, जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रींगप्रकरणीही नवाब मलिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.
मलिकांची ही संपत्ती ईडीकडून जप्त
- कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त
- कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त
- उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर जमीन जप्त
- कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स जप्त
- वांद्रे पश्चिमेतील 2 राहती घरेही ईडीकडून जप्त
आतातर त्यांच्या जामीनावर लवकर सुनावणी होईल असे वाटत नाही. कारण त्यांची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठासमोर सुरू असतानाच आता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची बदली गोवा खंडपीठात झाल्याने मलिक यांना पुन्हा नव्या कोर्टाकडे जावे लागेल. मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयात मलिकांना आता नव्या बेंचपुढे दाद मागावी लागणार आहे.