मुंबई, दि. १३ : सासवड-जेजुरी मार्गावर सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील वारकरी दिंडीला ट्रकने दिलेल्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि धक्कादायक असल्याची भावना शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या माजी उपसभापती आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील नंदा पवार, माधवी राजाराम सलगरे आणि राजश्री शंकर भोसले या वारकरी महिलांचा मृत्यू झाला असून, अन्य चार महिला जखमी झाल्या आहेत. या सर्व दिवंगत माऊलींना डॉ. गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच जखमी महिलांवर सर्वोत्तम उपचार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गेली अनेक वर्षे विधान परिषदेत सातत्याने उपस्थित केला जात आहे. शासन, पोलीस प्रशासन आणि विविध यंत्रणांकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना व सुरक्षा उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि वाहनचालकांनी वारकऱ्यांच्या दिंडीजवळ अत्यंत सावधगिरी बाळगणे ही दोन्ही बाजूंची समान जबाबदारी आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच स्थानिक स्वयंसेवक, दिंडी प्रमुख आणि नागरिकांनीही अधिक सजग राहण्याची गरज आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच आपण स्थानिक पदाधिकारी बजरंग पाटील, सुनीता मोरे तसेच कसबे डिग्रज येथील ग्रामस्थांशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या असून, पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाशीही चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातातील चालकाला अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
याचबरोबर डॉ. गोऱ्हे यांनी वारी मार्गावरील काही ठिकाणच्या खराब रस्त्यांच्या स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. सासवड-जेजुरी मार्गावरील खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे वारकरी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेनेचे पुणे शहर कार्यालय सचिव संदीप शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. वारी मार्गावरील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
राज्य शासनाने मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याचे स्वागत करत, मदत पोहोचेपर्यंत शिवसेनेच्या वतीनेही शक्य ती तातडीची मदत करण्यात येईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
“भक्तिभावाने पंढरीच्या वाटेवर निघालेल्या या माऊलींचा प्रवास अशा दुर्दैवी घटनेत संपुष्टात यावा, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे की, दिवंगत माऊलींच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,” अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

