सुरक्षा साधने, कामगारांसाठी सुरक्षित निवास आणि ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; दुर्घटना झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित होणार
पुणे | प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे बांधकामस्थळी जमीन खचणे, संरक्षक भिंती कोसळणे तसेच इतर दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि नियोक्त्यांना आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
सर्व बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि नियोक्त्यांनी ims.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नियोक्ता म्हणून ऑनलाइन नोंदणी करावी. बांधकामस्थळी कार्यरत कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, बूट आणि अन्य आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणे उपलब्ध करून सुरक्षित कामकाजाची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कामगारांच्या निवासाची पाहणी करण्याचे निर्देश
अतिवृष्टीच्या काळात जमीन खचणे, संरक्षक भिंती कोसळणे किंवा पाणी साचणे यांसारख्या घटनांचा धोका लक्षात घेऊन कामगारांच्या निवासस्थानांची पाहणी करावी. निवासस्थानी कोणताही धोका नसल्याची खातरजमा करून आवश्यकता असल्यास कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी.
कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्राथमिक उपचार आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अनोंदणीकृत कामगारांची तातडीने नोंदणी करा
बांधकामस्थळी कार्यरत अनोंदणीकृत कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तातडीने नोंदणी करावी. संबंधित कामगारांना शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक योजनांसह सुरक्षा संच, अत्यावश्यक संच आणि वैद्यकीय तपासणीचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बांधकाम कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भातील १३ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दुर्घटना झाल्यास व्यावसायिक आणि कंत्राटदार जबाबदार
सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बांधकामस्थळी अपघात किंवा मनुष्यहानी झाल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार अथवा नियोक्त्यालाच पूर्णपणे जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे

