मुंबई -चौकशीसाठी नेमलेला एसआय टी अधिकारी याचा प्रकल्पात समावेश असून सरकारी अधिकारी असलेल्या अनिलकुमार गायकवाड यांचे नाव घेत त्यांची प्रकल्पात हजार एकर जमीन आहे, पत्रकार वारीशेंची हत्या ही राजकीय हत्या आहे. चार पत्रकारांना यात जमिनी दिल्या गेल्या असे आरोप आज विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार वारीशे हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावर बोलताना केला .
तहसीलदाराला गाडीखाली आणले जाते , पत्रकाराला मारले जाते , मंत्र्याच्या तोंडावर शाई फेकली तर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले म्हणून कोर्टाने सरकारला २५ हजाराचा दंड ठोठावला , फडणविसांच्या पोलिसांचे चाललेय काय ? असे नाना पटोले यांनी म्हटले.
राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केलं म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीचं समर्थन करत होता. ही गंभीर बाब आहे. पत्रकार वारिसे यांच्या हत्येची नि:पक्षपणे चौकशी करावी, पोलिसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात यावा, तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यात पत्रकारांवर हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असून हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे.अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली .
सर्वात मोठा असा ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरु असून यामध्ये पोलीस उप अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली १६ जणांची एसआयटी टीम नेमली आहे. या प्रकरणाचा लवकरच तपास पूर्ण होईल.पत्रकार बांधवांवर हल्ला ही बाब गंभीर आहे. राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच पत्रकार संरक्षण कायदा केलेला आहे. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे. परंतु कडक कार्यवाहीबाबत आवश्यक असेल तर या कायद्यात सुधारणा करण्यात येईल. या तपास प्रकरणात कोणताही हस्तक्षेत नाही किंवा पोलीसांवर दबाव नाही. यामध्ये पोलिस महासंचालक यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात येतील. राज्य शासनाकडून या पत्रकाराच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार असून सर्वात मोठा असा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असणार आहे. यामध्ये ३ कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या हितासाठी हा प्रकल्प करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अधिक माहिती देताना सांगितले.