कला ही समाजाला जोडण्याचे आणि परिवर्तनाचे माध्यम : विलासजी राठोड
पुणे : नवकार आर्ट फाऊंडेशन आयोजित आणि महाराष्ट्रातील सर्जनशील युवा-ज्येष्ठ ६५ चित्रकारांचा सहभाग असलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला आज (दि. ३१) बालगंधर्व कलादालनात सुरुवात झाली. कला ही समाजाला जोडण्याचे आणि परिवर्तनाचे माध्यम आहे, असे मत पुणे सकल जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना त्यांची कलाकृती रसिकांसमोर सादर करण्याची संधी गेल्या ११ वर्षांपासून नवकार आर्ट फाऊंडेशन उपलब्ध करून देत आहे. फाऊंडेशनच्या या उपक्रमाला प्रत्येकवर्षी प्रतिसाद वाढत आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून ६५ चित्रकारांनी सहभाग नोंदविला असून यात २० बालकलाकार आणि ३५ महिला कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वय वर्षे सात पासून ते ७० वर्षे वय असलेल्या कलाकारांनी आपल्या आकर्षक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. कलाकृतींची निवड प्रक्रिया मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली. या निवड प्रक्रियेत ९० प्रवेशिकांमधून प्रमाणबद्धता, रंगसंगती आणि तंत्राच्या आधारे १२५ उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य संयोजक मनसुख छाजेड, प्रेरणा नहार यांनी प्रास्ताविकात दिली.

प्रदर्शनाचे उद्घाटन नवकार महामंत्राच्या पठणाने आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सुरेश लोणकर, संदीप भंडारी, नगरसेविका सपना छाजेड, मनिषा चोरबेले, सूर्यदत्ता ग्रुपचे प्रमुख संजय चोरडिया, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, मल्लिकार्जुन सिद्धगी, यशजी कलवणकर, मुकीम तांबोळी, शंकर गोर्जे आदी उपस्थित होते.
प्रदर्शनातील कलाकृतींची पाहणी करताना मान्यवरांनी कलाकृतींची संकल्पना, मांडणी आणि विविध तंत्रांविषयी कलाकारांशी संवाद साधला.
सुरेश लोणकर यांनी कार्यक्रमाचे आणि कलाकारांनी रेखाटलेल्या कलाकृतीच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. संदीप भंडारी यांनी कलेचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल फाऊंडेशनचे आभार मानले.
सपना छाजेड यांनी चित्रांमधील तंत्रांचे कौतुक करत या उपक्रमाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनिषा चोरबेले म्हणाल्या, जैन समाजाकडे केवळ व्यापारी म्हणून बघणाचा समाजाचा दृष्टिकोन या उपक्रमामुळे निश्चित बदलेल यात शंका नाही.
युवा तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन म्हणजे परिवर्तनाची प्रक्रिया असल्याचे संजय चोरडिया म्हणाले. कलेच्या माध्यमातून मानसिक आरोग्य चांगले राखता येते हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केल.
मुरली लाहोटी आणि मल्लिकार्जुन सिद्धगी यांनी नवीन पिढीतील कलाकारांना घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगितले. उपक्रमाबद्दल यशजी कलवणकर यांनी संयोजक मनसुख छाजेड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समर्पणाच्या भावनेतून सुरू केलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. मुकीम तांबोळी आणि शंकर गोर्जे यांनी कलाकारांच्या मेहनतीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बाफना यांनी केले. प्रदर्शन दि. २ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

