अनुसूचित जातींमधील ५९ घटकांना न्याय्य पद्धतीने आरक्षणाचा लाभ मिळावा – पुणे शहर जिल्हा मातंग समाजाची मागणी
पुणे : अनुसूचित जातींमधील ५९ घटकांना न्याय्य पद्धतीने आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच कोणत्याही समाजातील महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या पत्रकार परिषदेला माजी मंत्री दिलीप कांबळे, सुभाष जगताप, आमदार अमित गोरखे, अविनाश बागवे, विष्णू कसबे, शंकर तडाखे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे यांच्यासह समाजाच्या कोअर कमिटीचे सदस्य विकास सातारकर, भास्कर नेटके, डॉ. संपत जाधव, सुनील खंडागळे, सचिन जोगदंड, शंकर शेंडगे, ॲड. महेश सकट, संजय केंजळे, दयानंद आढागळे, लक्ष्मण तांदळे आणि समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली असून त्यामुळे आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत अधिक समतोल आणि न्याय्य पद्धतीने पोहोचू शकतो. मात्र, शासनाकडून अद्याप या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने समाजामध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी आपल्या भाषणात समाजातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीबाबत शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने राज्यव्यापी आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

