पुणे- बांधकाम नियमानुसार प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेसेस या असायलाच हव्यात ,आणि ज्या त्या बिल्डींगचे , व्यावसायिक गाळ्यांचे ,हॉल, हॉटेल्स,ऑफिसेस यांचे पार्किंग रस्त्यावर येत कामा नये हा साधा आणि जुना नियम पाळला तर रस्त्यावर पार्किंग ची समस्या निर्माण होणार नाही. पण याकडे महापालिका जाणून बुजून दुर्लक्ष करते आहे, तक्रारी केल्यावर होणार्या कारवाय या तात्पुरती मलम पट्टी करणाऱ्या ठरत आहेत. हा रोग एकदाचा समूळ नष्ट करा अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होतं आहे. यांस कळत नकळत मनपा चे कचखाऊ धोरण आणि अनधिकृत व्यवसायावर कठोर कारवाई प्रती ची अनास्था हे मुख्य कारण असल्याचे दिसून येते.शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची पाहणी केली असती सर्वत्र साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन व पार्किंग च्या जागेत अतिक्रमण करण्यात आले असून येथे अनधिकृतपणे व्यवसाय केला जातो.नागरिकांनी आवाज उठविल्यावर मनपा तोंड देखली कारवाई करते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !!
वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद असतानाही प्रशासन हे करत नसल्याने ही समस्या गंभीर होतं चाललीये.वानगी दाखल गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर ( फर्गयुसन कॉलेज रस्त्यावर ) तर व्यवसायिक इमारती अथवा प्रसिद्ध रेस्टॉरंट मधील पार्किंग ची जागा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्थिती आहे. ह्या रस्त्यावर वारंवार कारवाई होऊन ( म्हणजे कदाचित कारवाई चा विश्वविक्रम होईल इतक्यांदा कारवाई होते ) ही परिस्थिती जैसे थे आहे. याचे गमक काय असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडतो.
यात व्हॅलेट पार्किंग (Valet Parking) ची भर पडली असून ( हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये तुमची गाडी पार्क करण्यासाठी असणारा नियुक्त सेवक.) हे ग्राहकांच्या गाड्या सार्वजनिक रस्त्यांवर पार्क करतात ( जणू ह्या रस्त्यांचे तेच मालक असल्याच्या अविर्भावात.) गेल्या आठवड्यात वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कोथरूड च्या करिष्मा सोसायटी परिसरासह एरंडवण्यातील अनेक भागात नागरिक वाहतूक पोलिसांसह भेट दिली असता ही बाब प्रकर्षाने जाणवली. विशेषत: हॉटेल व्यवसायिक अरुंद गल्ल्यात व्हॅलेट पार्किंग उपलब्ध च्या नावाखाली गाड्या लावतात व त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो.यावर त्वरित कारवाई व कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास शहराची वाहतुकीची स्थिती अधिकच गंभीर होतं जाईल हे स्पष्ट दिसतंय.” आपलं पुणं ” देशातील सर्वोत्तम शहरात गणलं जावं असं वाटत असेल तर आता प्रशासनाने अंग झटकून कामं करणे आणि घटनेने दिलेले अधिकार आणि जबाबदारी यांचा निर्वाहन करणे ही काळाची गरज आहे. आपण याबाबत सकारात्मक पावले उचलाल व सक्त कारवाई कराल अशी खात्री वाटते.

