पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप आणि मित्र आघाड्यांकडे मिळून तब्बल ३३३ मतांची ताकद असल्याचा दावा करत पुण्याची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला २५ मे पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी महायुतीच्या कंपूत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. पुण्याची जागा आमची पारंपरिक असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले सर्वाधिक सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जात असताना दुसरीकडे आपल्या संख्याबळासह स्थानिक आघाड्यांचीही साथ घेत पुण्याची जागा भारतीय जनता पक्षालाच मिळायला हवी, असा दावा केला जात आहे.
पुण्यातील भाजपच्या नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली असून त्यात पुण्याची जागा ही भाजपनेच लढवावी, असा आग्रह धरण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. गणेश बिडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची आकडेवारी मांडत जिल्ह्यात भाजपच मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे. भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य निवडून आलेले आहेत. तर दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य, आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्यांचा भाजपला पाठिंबा असल्याचा दावा बिडकर यांनी केला आहे. सर्व आकडे पाहिल्यास एकूण ३३३ मतांची भक्कम ताकद भाजपकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे.
भाजपकडून मांडल्या जाणाऱ्या गणितानुसार भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य आहेत, त्यात स्थानिक आघाड्यांची २४ मतांची भर पडल्यामुळे भाजपने तब्बल ३५ मतांची आघाडी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे महायुतीतील जागावाटपात पुण्याची जागा भाजपनेच लढवावी, यासाठी पक्षाने जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे.
पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते असणारे गणेश बिडकर हे स्वतः विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. स्थानिक पातळीवर मोठ्या ताकदीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेत पुण्याच्या जागे संदर्भात चर्चा केली. ही जागा राष्ट्रवादीची पारंपरिक असल्याने आत्ताही आपल्याकडेच राहायला हवी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र आता भाजपने जुळलेल्या ३३३ सदस्याच्या आकड्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होणार आहे.

