महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ
मुंबई, दि. ११ जुलै २०२६ : महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आषाढी वारी काळात “महिला उन्नती वारी” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पालखी तळ, उरुळीकांचन, पुणे येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.
आषाढी वारीमध्ये राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. या मोठ्या लोकसहभागाच्या सोहळ्यादरम्यान महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसेच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “महिला उन्नती वारी” हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध हेल्पलाईन्स तसेच महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती व प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी लोककला सादरीकरणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, स्त्री सुरक्षा, सामाजिक प्रश्न तसेच शासनाच्या विविध योजनांवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महिला आयोगाच्या विविध उपक्रमांची तसेच महिलांसाठी उपलब्ध शासकीय सेवांची माहिती लाखो वारकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
आध्यात्मिक परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालणारा “महिला उन्नती वारी” हा उपक्रम महिलांचे सक्षमीकरण, सुरक्षितता, हक्कांविषयी जागरूकता आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक वारकरी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
000

