महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
पुणे : जगभरातील कोट्यावधी गणेश भक्तांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचे वैभव असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली.

या निर्णयामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. याबाबत ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला होता.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दररोज ५० ते ५५ हजार भाविक, दर संकष्टी चतुर्थीला २ ते ३ लाख भाविक आणि गणेशोत्सवात दीड कोटी भाविक दर्शनासाठी येतात. तर, दर महिन्याला जगभरातून तब्बल दोन हजार पर्यटक विविध देशातून मंदिराला भेट देतात.
मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे आसपासच्या परिसराचा विकास आणि भाविकांच्या सोयी- सुविधांसाठी सरकारकडून विशेष निधी उपलब्ध होईल. याशिवाय व्हीलचेअर रॅम्प, उत्तम सुरक्षा यंत्रणा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे आता जागतिक स्तरावर पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यास आणखी मदत होणार आहे. तसेच २० ते २५ हजार रोजगार निर्मिती या माध्यमातून पुढील पाच वर्षात होणार आहे , अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

