पुणे : लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य स्मारक जम्मू-काश्मीरमध्ये उभारु, अशी घोषणा ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी केली. ‘विश्व हिंदू मराठा संघा’च्यावतीने स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने डेक्कन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुनीत बालन म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा योद्धा या युगात झालेला नाही. मी भारतीय लष्करासमवेत काश्मीरमध्ये काम करतो. आपले भारतीय सैनिक जेंव्हा जेंव्हा युद्धाला जातात तेंव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम डोळ्यासमोर ठेवून लढत असतात. त्यांची ही प्रेरणाच आपल्या शूर जवानांना लढण्यासाठी मोठे बळ देत असते.’’ काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याठिकांणी रोज सकाळी साडेआठ वाजता महाराजांच्या पुतळ्याची आरती केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणेच कश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आणि स्मारक लष्कराच्या सहाय्याने आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विश्व हिंदू मराठा संघाला सोबत घेऊन उभारले जाईल. महाराजांच्या पुढील वर्षीच्या जयंतीच्या आधी स्मारकाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी पुनीत बालन यांनी दिली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित मंडळी, शिव-शंभू भक्त आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड भारत देशाचे आराध्य दैवत आहे. स्वराज्य निर्माण करुन त्यांनी घालून दिलेला आदर्श हा आपल्या सर्वांसाठीच पथदर्शी आहे. आजच्या युवा पिढीनेही याच मार्गाने वाटचाल केली पाहीजे यासाठी या दोन्ही राजांची स्मारकं गरजेची आहेत. म्हणूनच आम्ही काश्मीर खोऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.’’ – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.