मुंबई-
ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब बुधवारी उजेडात आली. त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मृत्यूपूर्वी त्यांच्यावर तब्बल 249 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांना अनेक राजकीय नेत्यांनी आदरांजली वाहली आहे.
हे अनाकलनीय – राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झाले. जवळपास 30 वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासे आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे.असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.
धक्कादायक बातमी – आदित्य ठाकरे
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी धक्कादायक आहे. भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली आणि ह्या धक्क्यातून, दुःखातून लवकर सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना !