मुंबई-मणिपूर, हरियाणात ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत आहेत. जिथे राज्यपाल महिला आहेत. राष्ट्रपती महिला आहेत. तरी देखील ठोस पावले उचलली जात नाहीत. देशाचे पंतप्रधान त्यावर संसदेत बोलण्यास तयार नाही. मग हे हिंदुराष्ट्र, रामराज्य कसे असू शकते, या दोन्ही राज्यात भाजप सरकार असून ते चालवण्यात असमर्थ आहे, असा हल्लाबोल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध विषयाला हात घालत भाजप-शिंदे गटावर जोरदार टीका केली.
ठाकरे म्हणाले की, ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘इंडिया’ ची बैठक मुंबईत पार पडेल. त्यासंदर्भातील निर्णय झाल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाईल, असे माहिती ठाकरे यांनी माध्यमांना दिली.
नितीन देसाईंचा मृत्यू ही घटना अतिशय वेदनादायी आहे. दुर्दैवी आहे. त्यांना अशी श्रद्धांजली वाहावी लागेल असे वाटले नव्हते. नितीन देसाई नेहमी म्हणायचे की, कोणतेही काम होऊन जाईल. नाट्य, सिने क्षेत्रातील मोठा व्यक्ती गेल्याची खंत आहे, असे ठाकरे म्हणाले. त्यांच्या मृत्यूवरून आत्ताच काही बोलणे उचित नाही. परंतू मृत्यूनंतर काही गोष्टी समोर येत असल्याचे वाईट वाटते.
समृद्धी महामार्गाच्या अपघातावर उद्धव ठाकरे म्हणाले की, काल ठाणे जिल्ह्यात झालेल्या कामगाराच्या मृत्यूची माहिती अतिशय भयानक आहे. त्यातील त्रुटी अशा राहू शकतात. त्या अतिशय धक्कादायक आहेत.
‘ते भिडेंना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे’
संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते जे आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे हे योग्य आहे आणि अयोग्य आहे असं म्हणत संभाजी भिडेंच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी उत्तर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. पत्रकारांनी विचारले की, फडणवीस भिडेंना गुरूजी म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि देशाला आणि राज्याला मारायचं ही पद्धतच घातक आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत, हीच अपेक्षा आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महिलांबद्दल शिवसेनेची भूमिका ठाम राहिली आहे. शिवसेनेने विधानपरिषदेच्या उपसभापती किंवा सभापती पदावर महिलेला बसविले होते. हा सर्वोच्च मान मला वाटते प्रथम किंवा दुसऱ्यांदा शिवसेनेना दिला आहे. त्याच महिला आता शिवसेनेच्या आमदारांना सभागृहात बोलू देत नसतील तर ते किती धक्कादायक आहे. एवढा काय बदल झाला त्यांच्यामध्ये त्यांनाच माहिती, अशी टीका ठाकरे यांनी निलम गो्रहे यांच्यावर केली.
भाजप सरकार चालवू शकत नाही. हे मणिपूर, हरियाणामध्ये सिद्ध झाले. महाराष्ट्रात सुद्धा सरकार आले नव्हते. हे त्यांनी फोडाफोडी करून राज्य आणले. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल एवढेच म्हणेन, असा टोला ठाकरे यांनी मोदी,शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर केला आहे.