‘इंटरनेट,’एआय’च्या जमान्यात कौटुंबिक आपलेपणा वाढविण्याची नवी जबाबदारी आता प्रत्येक आईवर’
पुणे –
सद्यस्थितीत विविध दूरचित्रवाहिन्या पाठोपाठ मोबाईल, इंटरनेट ,व्हाट्सअप ,इंस्टाग्राम, ट्विटरच्या जगात मुलं पालकांपासून दूर जात आहे. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात पालक आणि मुलं यांच्यातील अंतर अधिक वाढणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवून कौटुंबिक आपलेपणा मुलांमध्ये वाढविण्याची नवी जबाबदारी आता प्रत्येक आईवर येऊन ठेपली असून कुटुंबातील संवाद हाच नात्यांमधील जिव्हाळा वाढवेल असे प्रतिपादन पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री आबा बागुल यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, जय शंकर ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्रीराम योग साधना,धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने जयश्री आबा बागुल यांचा ज्योतीकुमार अग्रवाल यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर पुणे महापालिकेच्या सहायक आयुक्त सुरेखा शिंदे, रविंद्र गोलार,भारती विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील, माजी नगरसेविका अश्विनी भागवत आदी उपस्थित होते.
यावेळी जयश्री बागुल म्हणाल्या कि, माझे पती माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासोबत प्रदीर्घ काळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात मी काम करीत आहे. मात्र समाजासाठी वेळ देताना घराकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेत राहते. मुलांना लहान वयापासून वाढवताना आईने त्यांच्यावर केलेले संस्कार हेच अतिशय महत्वाचे असतात. प्रत्येक आई आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करते. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही म्हण अतिशय सार्थ आहे. मी माझ्या मुलांचे संगोपन केले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले.
आता सुना आणि नातवंड यांनी भरलेल्या ‘गोकुळा’त मी रमून जाते. अधून मधून वृद्धाश्रमाबद्दलच्या बातम्या ऐकू येतात तेव्हा वाईट वाटते. कोणतीच आई वृद्धाश्रमात जायला नको असे मला वाटते.असेही त्या म्हणाल्या.